मुंबई – महाविकास आघाडी सरकारने दिलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रद्द केली आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना यादी रद्द करण्यासाठी पत्र पाठवले होते. या पत्राची दखल घेत त्यांनी यादी रद्द केली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०२० मध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी पाठवली होती. मात्र, या यादीवर कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. राज्यपालांनी याबाबत निर्णय घेणं टाळलं. यावरून महाविकास आघाडी सराकने राज्यपालांवर टीकाही केली होती. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही याबाबत महाविकास आघाडीने तक्रार केली होती.
हेही वाचा – ठाकरेंनी दिलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द करा, मुख्यमंत्री शिंदेची राज्यपालांकडे विनंती
शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, विजय करंजकर, नितीन बानगुडे-पाटील, चंद्रकांत रघुवंशी, राष्ट्रवादीकडून शेतकरी नेते राजू शेट्टी, माजी मंत्री एकनाथ खडसे, यशपाल भिंगे आणि लोकगीतकार आनंद शिंदे काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, अनिरुद्ध वंकर आणि मुझफ्फर हुसैन यांची या यादीत नावे होती.
दरम्यान, जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी सेनेतील ४० आमदारांना घेऊन बंडखोरी केली. भाजपासोबत जात त्यांनी सत्ता स्थापन केली. त्यामुळे सत्ताबदल झाल्याने ठाकरेंनी पाठवलेली यादी राज्यपाल मान्य करतील की नाही याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु, शनिवारी, ३ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पत्र लिहून उद्धव ठाकरेंनी पाठवलेली यादी रद्द करावी, अशी मागणी केली.
हेही वाचा – राज्यपाल नियुक्त आमदारांचे काय झाले?
राज्यपालांनी आज ही मागणी मान्य केली आहे. त्यानुसार, उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपाल नियुक्त १२ नावांची आमदारांची पाठवलेली यादी राज्यपालांनी रद्द केली आहे. तसंच, एकनाथ शिंदे लवकरच नव्याने यादी जाहीर करणार आहे.