राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारने या लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी काही घटकांचा विचार करुन आर्थक पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये शेतकरी, सलून व्यावसायिक,फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते डबेवाले व छोटे व्यावसायिक यांचाही समावेश करण्यात यावा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे भयावह स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कडक निर्बंधासह कलम १४४ लागू केले आहे. तसेच काही विक्रेते आणि समाज घटकांना आर्थिक पॅकेजही जाहीर केले आहे. परंतु आणखी काही घटकांचाही यामध्ये समावेश करावा अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
काय म्हणाले नाना पटोले
राज्यात कोरोना प्रादुर्भावाची साखळी रोखण्यासाठी संचारबंदी घोषित केली आहे. या निर्णयाचे स्वागतच आहे. राज्यातील जनतेचे जीव वाचवणे ही सरकारची प्राथमिकत आहे. महाविकास आघाडी नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार संचारबंदी लागू केल्यावर छोट्या व्यावसायिकांकरिता आपण पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजमध्ये अजून काही घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे.
संचारबंदीमध्ये भाजीपाला, फळबागायतदार, फुलांच्या शेती व्यावसायावरही मोठा परिणाम झाला आहे. मार्केटमध्ये मालाचा उठाव मोठ्या प्रमाणावर होत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. सलून बंद असल्यामुळे त्यांचेही मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी, सलून व्यावसायिक,फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते डबेवाले व छोटे व्यावसायिक यांचाही पॅकेजमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.