धक्कादायक! राज्यात बेपत्ता मुलींच्या आकडेवारीत वाढ, दररोज 70 मुली बेपत्ता

धक्कादायक! राज्यात बेपत्ता मुलींच्या आकडेवारीत वाढ, दररोज 70 मुली बेपत्ता

राज्यात बेपत्ता मुलींच्या आकडेवारीत वाढ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मार्च महिन्यात राज्यातील तब्बल 2 हजार 200 मुली बेपत्ता झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. तर दररोज 70 मुली बेपत्ता होत आहेत. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संख्येत 390 ने वाढ झाली असून ही आकडेवारी गंभीर आहे. तसेच बेपत्ता होणाऱ्या मुलींचं प्रमाण हे 18 ते 25 या वयोगटातील आहे.

मार्च महिन्यात राज्यातून 2200 मुली बेपत्ता झाल्या आहेत, त्याआधी फेब्रुवारी महिन्यात ही संख्या 1810 इतकी होती. त्यामुळे एकाच महिन्यात बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संख्येत 390 ने वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे. नोकरी, लग्न, प्रेमाचं आमिष दाखवून मुलींची दिशाभूल केली जात असून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात आहेत. काही पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकरणातून किंवा वेगवेगळ्या आमिषाला बळी पडून आणि घर सोडून जाणाऱ्या मुलींचे प्रमाण जास्त आहे.

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण जास्त असल्याचं समोर आलं आहे. पुणे, नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे प्रमाण अधिक आहे. मार्च महिन्याची आकडेवारी पाहता, पुण्यातून 2258, नाशिक 161, कोल्हापूर 114, ठाणे 133, नगर 101, जळगाव 81 तर सांगलीतून 82 मुली बेपत्ता झाल्या आहेत.

दरम्यान, दिवसेंदिवस मुली आणि महिलांची बेपत्ता होण्याची संख्या वाढते हे चिंताजनक असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. 2020 पासून हरवलेल्या महिलांच्या बाबतीत महाराष्ट्र नंबर एकवर आहे. तर आम्ही राज्य महिला आयोगाच्यावतीनं वारंवार पाठपुरावा करत आहोत, असंही त्या म्हणाल्या. जानेवारी 2023 ते मार्च 2023 या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता, राज्यातील 5,610 मुली बेपत्ता झाल्याचं स्पष्ट आहे.


हेही वाचा : माझ्या हृदयात फक्त विठ्ठलाचे स्थान, विठूरायाच्या दर्शनानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया


 

First Published on: May 7, 2023 10:35 PM
Exit mobile version