राज्य पोलीस दलातील आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

राज्य पोलीस दलातील आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

पोलिस

मुंबईः राज्य पोलीस दलातील बारा आयपीएस अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी गृहविभागाने जारी केले. यातील बहुतांश अधिकारी बदलीच्या प्रतिक्षेत होते. अखेर त्यांच्या बदलीचे आदेश निघाले असून त्यांना तातडीने बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास सांगण्यात आले आहे.

बिपीनकुमार सिंग यांची महाराष्ट्र राज्य आर्थिक गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस महासंचालक, प्रभातकुमार यांची होमगार्डच्या उपमहादेशक आणि अप्पर पोलीस महसंचालक, विनित अग्रवाल यांची म्हाडाच्या अप्पर पोलीस महासंचालक-मुख्य दक्षता अधिकारी, राजकुमार व्हटकर यांची प्रशिक्षण-खास पथकाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.

जय वसंतराव जाधव यांची महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, कैसर खालिद यांची मोटार परिवहन विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, डी. के पाटील भुजबळ यांची पुणे गुन्हे शाखेच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, एस. एच महावरकर यांची नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस उपमहानिरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.

अभिजीत सुरेश शिवथरे यांची राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेच्या सहाय्यक पोलीस महानिरीक्षक, नाशिक शहराच्या उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांची मिरा-भाईंदर-वसई-विरारच्या पोलीस उपायुक्त, अमरावतीचे पोलीस अधिक्षक राहुल डी खाडे यांची जालन्याच्या अप्पर पोलीस अधिक्षक, नागपूरच्या अप्पर पोलीस आयुक्त नीवा जैन यांची नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनच्या सचिव-अप्पर निवासी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच याच महिन्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याही सरकारने केल्या. भारतीय प्रशासकीय सेवेतील 2011च्या तुकडीतील राधाविनोद शर्मा यांची बीड जिल्हाधिकारी पदावरून औरंगाबाद येथील सिडकोच्या (न्यू टाऊनशिप) मुख्य प्रशासकपदी बदली करण्यात आली आहे. याशिवाय, भारतीय प्रशासकीय सेवेतील 2011च्या तुकडीतील सिद्धराम सालिमठ यांची अहमदनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, भारतीय प्रशासकीय सेवेतील 2012च्या तुकडीतील निधी चौधरी यांची मुंबई उपनगर जिल्हाधिकारी पदावरून विक्रीकर सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. निधी चौधरी यांना या मुंबई उपनगर जिल्हाधिकारी होण्यापूर्वी त्या रायगडच्या जिल्हाधिकारी होत्या. मात्र, त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच त्यांची रायगडमधून उचलबांगडी करण्यात आली. आताही दीड वर्षाच्या आतच मुंबई उपनगर जिल्हाधिकारीपदावरून त्यांना हटविण्यात आले आहे.

First Published on: February 28, 2023 7:28 PM
Exit mobile version