महाविकास आघाडीच्या पुढील वज्रमुठ सभा तुर्तास रद्द; काय आहे कारण?

महाविकास आघाडीच्या पुढील वज्रमुठ सभा तुर्तास रद्द; काय आहे कारण?

नाशिक : महाविकास आघाडी मधील एकी अजून बळकट करण्याच्या इराद्याने संपूर्ण महाराष्ट्रभर वज्रमुठ सभा मोठ्या दिमाखात सुरू करण्यात आल्या होत्या. यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगर, दुसरी सभा नागपूर तर तिसरी सभा नुकतीच महाराष्ट्र दिनी मुंबईत पार पडली. मात्र, यापुढील वजन सभा या तूर्तास रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबतच प्रश्न उपस्थित होत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशन सोहळ्यात पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. यामध्येच महाविकास आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न उपस्थित केले गेले होते. शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी खळबळ उडाली असून पक्षाचे भवितव्य काय, पक्षाचे नेतृत्व कोणाकडे जाणार, अशा अनेक विषयांवर मोठी खलबत सुरू आहेत. यातच आता पुढील संभावित वज्रमुठ सभा रद्द झाल्याने नेमके यामागे काय कारण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निर्माण झालेला पेच प्रसंग महाविकास आघाडीला बाधक ठरतोय का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतोय.

दरम्यान, मागील महिन्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याही भारतीय जनता पार्टीची जवळीक असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मागील काही वर्षात अशा पद्धतीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच, अजित पवार व शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती गौतम अदानी यांच्या बाजूने घेतलेली सौम्य भूमिका यामुळेही अजित पवार यांच्याबाबत येणाऱ्या बातम्यांना बळ मिळत होते.

त्यातच मागील काही काळातील महाविकास आघाडी मधील नेत्यांची वक्तव्य, हालचाली लक्षात घेता सगळं काही आलबेल नाही असे संकेत मिळत होते. उद्धव ठाकरे यांचे वाढत चालेल महत्व, त्यांच्या बाजूने असलेली सहानुभूती या बाबी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मधील नेत्यांना अस्वस्थ करत असल्याचे दिसून आले होते. खरंतर, महाविकास आघाडी ही सत्तास्थापन करण्यासाठी आणि भाजपाला दूर ठरवण्यासाठी निर्माण झालेला राजकीय डाव होता. यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक होता तो म्हणजे शरद पवार, पावरांच्याच कल्पना व पुढाकाराने हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते. मात्र, त्यांच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीची वीण सैल होतेय की काय? अशी चर्चा रंगत आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यात तथ्य?

माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकताच एका जाहीर कार्यक्रमात भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. या त्यांनी असे म्हटले आहे की, राष्ट्रवादीचे काही खरे नाही ते आज आपल्या सोबत आहेत उद्या असतील की नाही ते माहीत नाही’ असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवर संशय घेतला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रदीर्घकाळ दिल्लीमध्ये आपलं राजकीय जीवन व्यतीत केला आहे. त्यांच्याकडे कुठली वेगळी माहिती आहे का? आणि त्याच आधारावर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल असे वक्तव्य करतायेत का? अशीही चर्चा राजकीय पंडितांमध्ये घडताना दिसून येत आहे.

कुठे कुठे होणार होत्या वज्रमुठ सभा

महाविकास आघाडीची पहिली वज्रमुठ सभा छत्रपती संभाजी नगर येथे झाली, त्यानंतर भाजपच्या बालेकिल्ल्यात अर्थात नागपूरमध्ये दुसरी सभा पार पडली तर एक मे महाराष्ट्र दिन या दिवशी मुंबईमध्ये सभा पार पडली. यानंतर पुढील टप्प्यात कोल्हापूर, नाशिक व पुणे या राज्यातील प्रमुख शहरात सभा नियोजित होत्या. मात्र, या सभा आता रद्द करण्यात आल्या आहेत. तिसऱ्या टप्प्यात अमरावती सोलापूर जळगाव या ठिकाणी सभा होणार होत्या.

First Published on: May 3, 2023 5:16 PM
Exit mobile version