मराठा समाजाच्या सर्वत्र सुरू असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला राज्य सरकारच्या मेगा भरतीमध्ये १६ टक्के आरक्षण मिळेल, असे सांगितले. सध्या होत असलेल्या ७२ हजार पदांच्या भरतीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळेल पण त्याशिवाय यापुढे होणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा १६ टक्के आरक्षण मिळेल असे मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत जाहीर केले. विधानसभेत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्थगन प्रस्ताव मांडला गेला. यावर अनेक सदस्यांनी आपले मत व्यक्त केले, त्यानंतर आपल्या निवेदनात मुख्यमंत्र्यांनी सदर घोषणा केली.
राज्य सरकारने मराठा समाजासाठी कायदा केला होता. मात्र हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे राज्य सरकारने मनात आणले तरी काही करता येत नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मराठा आरक्षण मिळेल या तत्वावर राज्य सरकार नोकरभरती करेल. आरक्षण लागू झाल्यानंतर हा बॅकलॉग भरून काढला जाईल, असेही ते म्हणाले.
पंढरपूरला आंदोलन करु नका – मुख्यमंत्री
सध्या राज्यात वारीचे वातावरण आहे. मराठा समाजातर्फे एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये आंदोलन केले जाणार असे बोलले जात होते. राजकारण करायचे असेल तर अनेक जागा आहेत, पण मागच्या शेकडो वर्षांपासून जी परंपरा चालू आहे ती खंडीत करण्याचा प्रयत्न करु नका, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना केली.
१६ टक्के आरक्षण विरोधी पक्षामुळे – विखे पाटील
राज्य सरकारच्या नोकरभरतीत मराठा समाजासाठी १६ टक्के जागा रिक्त ठेवून आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर अनुशेष म्हणून त्या जागा भरण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा, हे विरोधी पक्षांचे मोठे यश असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
राज्य सरकार ७२ हजार पदांसाठी मेगाभरती केली जाणार आहे. त्यामध्ये मराठा समाजाच्या १६ टक्के जागा बाजुला ठेवा आणि त्यानंतर भरती करा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत स्थगन प्रस्ताव मांडून केली होती. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरामध्ये अनेक शंका निर्माण होत आहेत, असे मुंडे यांनी सांगितले. पुन्हा १६ टक्के जागा भरायला काढल्या तर त्यात वेगळे आरक्षण लागणार नाही हे कशावरुन? याच्याबाबतीत राज्यसरकारने उत्तर दिलेले नसल्याचे मुंडे म्हणाले.