दहीहंडी खेळणाऱ्या गोविंदांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 5 टक्के आरक्षणामध्ये समावेश करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. आज उदय सामंत, आमदार प्रताप सरनाईक आणि दहीहंडी समन्वयक समितीच्या सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. दरम्यान, आपल्या मातीतल्या मराठमोळ्या उत्सवाचं रुपांतर खेळामध्ये झालं तर चुकीचं काय?, असा सवाल शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांची मंत्रालयात बैठक झाली. क्रीडा खात्याच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विधानसभेच्या या अधिवेशनात यासंदर्भातील निर्णय राज्य शासनाने जाहीर करावा असं ठरलं. क्रीडा खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी त्याला अनुमती दिली. तसेच मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून गुरूवारी अधिवेशनाच्या दरम्यान विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना दहीहांडी साहसी क्रीडा प्रकारात समाविष्ट करण्यात आला आहे. त्याच्या स्पर्धा प्रो गोविंदा पुढल्या वर्षापासून करण्यात येईल असं जाहीर केलं.
मुंबईत बाळा पडलकर, भरत पाटील आणि संदीप ढवळे यांसारख्या लोकांनी गोविंदासाठी आपलं आयुष्य झोकून दिलं आहे. मुंबई, ठाण्यातील गोविंदा पथकं जागोजागी जाऊन जर आपली संकल्पना प्रत्यक्षात उतरवत असतील. तसेच त्या खेळाला साहसी खेळाची मान्यता दिलेली असेल. परंतु विरोधी पक्षाच्या नेत्यांचा नकार असेल तर त्याचा निषेध करणं गरजेचं आहे. आम्ही मागील २३ वर्षांपासून गोविंदाचं आयोजन करत आहोत. तसेच अनेक गोविंदा पथकांनी विश्वविक्रम सुद्धा केला आहे. त्याच गोविंदा पथकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती की, साहसी क्रीडा प्रकारात समाविष्ट झाल्यानंतर आमच्या खेळाला प्राधान्य मिळेल. लाल मातीतला हा मराठमोळा उत्सव आहे. त्याचं रुपांतर जर खेळामध्ये झालं तर चुकीचं काय आहे, असं प्रताप सरनाईक म्हणाले.
ज्याप्रमाणे, कबड्डी, खो-खो, कुस्ती यांसारख्या खेळांमध्ये जे खेळाडू खेळ करतात. त्यांना नोकरीमध्ये किंवा शिक्षणाचे इतर जे फायदे मिळतात. त्यांच्याप्रमाणे त्यांना सुद्धा भविष्यात फायदा मिळू शकेल, अशा प्रकारची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी गोविंदाचा सण होता. राज्यभरात सुरू असणाऱ्या उत्सवात सर्व गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. या वर्षीचा उत्साह वेगळाच होता. आज आमच्यासोबत सर्व समन्वयक समिती आहे, असं प्रताप सरनाईक म्हणाले.