राज्यातील पूर परिस्थितीमुळे मनसेचा उद्याचा मेळावा पुढे ढकलला, राज ठाकरेंचा निर्णय

राज्यातील पूर परिस्थितीमुळे मनसेचा उद्याचा मेळावा पुढे ढकलला, राज ठाकरेंचा निर्णय

राज्यभरात सुरू अससेल्या मुसळधार पावासामुळे (Heavy Rainfall) अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुरस्थितीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्याचा मेळावा पुढे ढकलला आहे. याबाबत राज ठाकरे यांनी एका पत्राद्वारे माहिती दिली. गुरुपौर्णिमेनिमित्त राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. (MNS Raj Thackeray Rally postponed due to heavy rain conditions in Maharashtra)

राज ठाकरे यांचा हा मेळावा बुधवारी गुरुपौर्णिमेनिमित्त (Guru pournima) राज ठाकरे यांनी सकाळी दहा वाजता होणार होता. या मेळाव्यात मुंबईतील सर्व मनसे नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष ते उपशाखाअध्यक्ष तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी यांना आमंत्रित करण्यात केले होते.

राज ठाकरेंच्या पत्रात काय लिहिलेय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी
सस्नेह जय महाराष्ट्र !
तुम्हाला जरा थोड्या तातडीनं कळवतो आहे.

आपण वास्तविक उद्या एक मेळावा आयोजित केला होता. ज्यात मला तुमच्याशी बोलायचं होतं आणि कामासंबंधी काही सूचना करायच्या होत्या. परंतु कालपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसानं थैमान घातलेलं दिसत आहे. जनजीवन तर विस्कळीत आहेच, परंतु अशा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हा सर्वांना सांगणार होतो तो सांगितला तरी तो प्रत्यक्षात आणता येणं फार अवघड आहे. अशा परिस्थितीत आपण उद्याचा मेळावा पुढे ढकलत आहोत. पुढची तारीख आणि वेळ लवकरच, थोडा पावसाचा अंदाज घेऊन, तुम्हा सर्वांना कळवली जाईलच.

दरम्यान, तुम्ही स्वतःची तर काळजी घ्याच परंतु अतिवृष्टीमुळे जिथे लोकांना त्रास होतो आहे तिथेही तुम्ही लोकांसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. मुख्यतः नदीकाठाला जिथे लोक रहात आहेत तिथल्या घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. सांगली – कोल्हापूरकडचा आत्ता-आत्ताचा पूर तुम्हाला आठवतोय ना? काही लोकांना तात्पुरत्या निवासात हलवायला लागू शकतं. तिथे अन्नधान्य, पिण्याचं शुध्द पाणी, अंथरूण-पांघरूण (सर्वत्र ओल असते) पुरवावं लागेल. मुख्यतः वृध्द, गरोदर महिला, अपंग आणि लहान मुलं ह्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. झाडं उन्मळून पडतात, ती नंतर पुन्हा लावावी लागतील. अशा खूप गोष्टी आहेत.

एक लक्षात घ्या की अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असतात त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण ताण येईल असं काहीही करू नका.
अर्थात, असं काही होऊ नये, कुठलंही नैसर्गिक संकट येऊ नये, हीच आपली इच्छा आहे, फक्त सतर्कतेसाठी सांगितलं.
लवकरच भेटू,

२४ तासांत पावसामुळे ९ जणांचा मृत्यू

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, मुंबई, सातारा, मराठवाडा आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आहे. राज्यात गेल्या २४ तासांत पावसामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत ७० हून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे.


हेही वाचा – राज्याच्या ‘या’ भागांत रेड अलर्ट जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

First Published on: July 12, 2022 10:51 AM
Exit mobile version