मोदी सरनेम प्रकरण : राहुल गांधींविरोधात ओबीसी समाज राज्यभर आंदोलन करणार – बावनकुळे

मोदी सरनेम प्रकरण : राहुल गांधींविरोधात ओबीसी समाज राज्यभर आंदोलन करणार – बावनकुळे

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विचार सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये मोदी आडनावावर केलेल्या वादग्रस्त टीक्केप्रकरणी सुरत जिल्हा न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली असून त्यांना जामिनही दिला आहे. परंतु राहुल गांधींना शिक्षा दिल्यानंतरही त्यांनी मोदींची माफी न मागितल्यामुळे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जातीवादी प्रवृत्ती ठेचून काढणार असे वक्तव्य केले आहे.ॉ

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधींना सुरत जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे ओबीसी समाज आणि ओबीसी समजातील तेली समाजातून देशाभर प्रतिक्रिया येत आहेत. राहुल गांधींनी मोदींना अर्वाच्च भाषेत जी चोर म्हणून टिप्पणी केली होती. त्यावेळीसुद्धा ओबीसी समाजाकडून प्रतिक्रिया आली होती. राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा अपमान केला तो न्यायालयाच्या निर्णयाने आपल्या समोर आला आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचा वारंवार अपमान करणाऱ्या राहुल गांधींविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी आंदोलन करणार आहे.

राहुल गांधी आणि काँग्रेस एवढे निर्लज्ज झाले की, न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही हे म्हणत आहे की न्यायालय दबावाखाली काम करत आहे. मोदींसारख्या ओबीसीच्या मोठ्या नेत्याला जातीवाचक शिवीगाळ करायची. त्या व्यक्तीचा मागासवर्गीस अपमान करायचा, तेली समाजाचा अपमान करायाचा आणि कोर्टाने निकाल दिला म्हणून कोर्टाचा अपमान करायचा. परंतु जेव्हा काँग्रेसच्या बाजूने निकाल लागतो तेव्ह लोकशाही आणि काँग्रेसच्या विरोधात निकाल लागला तर हुकुमशाही, हे कुठेतरी पटत नाही. त्यामुळे या देशातील ओबीसी समाज आणि तेली समाज राहुल गांधींचा निषेध करत आहे.

काँग्रेसचे नेते आज न्यायालयाचा अवमान करत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. कारण त्यांनी न्यायालयावर, न्यायालयाच्या आदेशावर, न्यायालयाच्या भूमिकेवर आक्षेप घेतले आहेत. कुठल्याची निर्णयावर आक्षेप घेता येत नाही. त्यासाठी वरच्या कोर्टात जावे लागते. पण वरच्या कोर्टात तुम्हाला न्याय मिळणार नाही हे तुम्हाला माहित आहे. कारण तुम्ही जाहिर सभेत मोदींवर जातिवाचक शब्द वापरून अपमान केला आहे. या जातिवाचक प्रवृत्तीला आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ठेचून काढणार आहोत. राहुल गांधींच्या या वक्तव्याला आम्ही महाराष्ट्रामध्ये निषेध करणार आहोत. काँग्रेसचे मगरमच्चे ज्यांनी मोदींना चोर म्हणून समाजाचा, जातीचा अपमान केला आहे. या प्रवृत्तीला आम्ही झोडून काढून त्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार आहोत. इतक्या खालच्या थरावर त्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे त्याच्याविरुद्ध आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत.

ओबीसी समाजाचा घटक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींनी भारताचा ठसा उमटवला आहे. इतक्या मोठ्या नेतृत्वावर जातीवाचक उद्देशाने टीका केल्यामुळे कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे आज ओबीसीला न्याय मिळाला आहे. राहुल गांधी उद्या सुप्रीम कोर्टात जरी गेले तरी त्यांना एकदिवस जेलमध्ये जावेच लागले. कारण त्यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. त्यामुळे समाज त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

कोर्टाने सुनावली शिक्षा
मोदींच्या आडनावावर केलेल्या टिप्पनीवर गुजरातमधील सुरत जिल्हा न्यायालयाने चार वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली असली तरी त्यांना न्यायालयाने जामीनही दिला आहे. जामीन मंजूर करताना सुरत न्यायालयाने ३० दिवसांची शिक्षा स्थगित केली आहे. म्हणजेच उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यासाठी त्यांना न्यायालयाकडून वेळ मिळाला आहे. न्यायालयाने राहुल गांधी यांना आयपीसीच्या कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत दोषी ठरवले आहे.

काय प्रकरण आहे?
राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर केलेल्या वादग्रस्त टिप्पणीशी हे प्रकरण संबंधित आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलार येथे एका सभेत वक्तव्य केले होते की, “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकच का आहे? सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे?” या वक्तव्याबाबत भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल करताना राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. राहुल गांधींच्या टिप्पणीने संपूर्ण मोदी समाजाची बदनामी केली आहे, असे भाजप नेत्यांनी म्हटले होते.

First Published on: March 23, 2023 5:54 PM
Exit mobile version