केंद्र सरकारची ६,८१३ कोटी रुपयांची घोषणा ठरली फोल? संभाजीराजेंचे राज्यपालांना पत्र

केंद्र सरकारची ६,८१३ कोटी रुपयांची घोषणा ठरली फोल? संभाजीराजेंचे राज्यपालांना पत्र

देवेंद्र फडणवीस यांनी पूरबाधित लोकांच्या पुनर्वसनासाठी सुमारे ६,८१३ कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती

महाराष्ट्रात यावर्षी सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये प्रचंड मोठा महापूर आला होता. या महापुरात शेकडो संसार उघड्यावर पडली होती. शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. अशा परिस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरबाधित लोकांच्या पुनर्वसनासाठी सुमारे ६,८१३ कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, यापैकी एकही रुपया अजूनही महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत आला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर यासंदर्भात माहिती टाकली आहे. याप्रकरणी आपण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

महाराष्ट्रात ६,८१३ कोटी रुपये मदतीच्या घोषणेसंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत अजूनही केंद्राकडून महाराष्ट्राला एकही रुपयाची मदत दिली गेली नसल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे स्वत: केंद्रीय गृह खात्याने ही बाब सुप्रीम कोर्टात मान्य केली आहे. याशिवाय केंद्र सरकारने ६,८१३ कोटी रुपयांपैकी ९०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. मात्र, महाराष्ट्र सरकारने नुकसानीचे अंतिम अहवाल अजूनही दिलेले नाही. त्यामुळे मंजूर केलेले ९०० कोटी रुपये राज्य सरकारला मिळालेले नसल्याचे गृह खात्याने कोर्टात म्हटले आहे. या सर्व प्रकरणाविषयी संभाजीराजे यांनी फेसबुकवर माहिती दिली आहे. या माहितीत त्यांनी आपण याप्रकरणी राज्यपालांना पत्र पाठवले असल्याचे देखील सांगितले. याशिवाय त्या पत्राचा फोटो देखील त्यांनी शेअर केला आहे.

First Published on: November 18, 2019 10:30 PM
Exit mobile version