राज्य मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालामध्ये सिंधुदूर्गातील कासार्डे माध्यमिक विद्यालयातील मृण्मयी विजयानंद गायकवाड या विद्यार्थींनींला पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. मृण्मयीची ही कामगिरी कोकण विभागातून ऐतिहासिक ठरली आहे.
कासार्डे गावातील मृण्मयी हिने शाळेत शिकवण्यात येत असलेला अभ्यास व दररोज घरी नियमित अभ्यास करून हे यश मिळवले आहे. मृण्मयीला कम्प्युटर सायन्समध्ये करियर घडवायचे आहे. त्यासाठी तिने आता सायन्सला प्रवेश घेणार आहे. दहावीच्या अभ्यासासाठी मृण्मयीला कोणत्याही प्रकारची अतिरिक्त शिकवणी लावण्यात आली नव्हती. असे तिचे वडिल विजयानंद यांनी सांगितले. मृण्मयीला मराठीमध्ये ९९, हिंदी ९६, इंग्रजी ९८, गणित ९७, विज्ञान व तंत्रज्ञान १००, समाजशास्त्र ९७ गुण मिळाले आहेत. तर तिला ९ गुण अतिरिक्त देण्यात आल्याने तिला ५०० पैकी ५०० गुण मिळाले आहेत. विजयानंद हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मोसम 2 या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मुलीने मिळवलेल्या यशाबद्दल त्यांना प्रचंड आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.