कंगना ही भाजप आणि RSS च्या स्वातंत्र्य लढ्याला बदनाम करण्याच्या कुटील डावाचाच भाग – नाना पटोले

कंगना ही भाजप आणि RSS च्या स्वातंत्र्य लढ्याला बदनाम करण्याच्या कुटील डावाचाच भाग – नाना पटोले

अभिनेत्री कंगना रनौत वारंवार बाष्कळ बडबड करुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेले, तुरुंगवास भोगलेले स्वातंत्र्यसैनिक आणि संपूर्ण देशाचा अवमान करत आहे. तसंच, कंगना जी बडबड करत आहे ती भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वातंत्र्य लढ्याला बदनाम करण्याच्या कुटील डावाचाच भाग आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

कंगनाच्या वक्तव्यांना प्रसिद्धी देऊन माध्यमांनी तिला व्यासपीठ उपलब्ध करुन देऊ नये असं आवाहन नाना पटोले यांनी केलं आहे. कंगनाच्या विधानावर बोलताना पटोले पुढे म्हणाले की, कंगना जी बडबड करत आहे ती भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वातंत्र्य लढ्याला बदनाम करण्याच्या कुटील डावाचाच भाग आहे. याला भाजपचाही पाठिंबा आहे असा आमचा आरोप असून भाजपने याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी, असं नाना पटोले म्हणाले.

महाराष्ट्राला बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, प्र. के. अत्रे, गोपाळ गणेश आगरकर, गोविंद तळवळकर असे महान संपादक, पत्रकार लाभले, त्यांनी अशा समाजविघातक प्रवृत्तींवर कडाडून प्रहार केला होता. आपण सर्वांनी याची आठवण ठेवून कंगनासारख्या समाजविघातक विखारी प्रवृत्तींना प्रसिद्धी देऊ नये असं आवाहन नाना पटोले यांनी माध्यमांना केलं.

पेट्रोल डिझेलवर सेस वाढवून केंद्राने राज्याचे ३० हजार कोटी रुपये हडपले

केंद्रातील मोदी सरकार मागील सात वर्षांपासून पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वाढवून जनतेची लूट करत आहे. सतत दरवाढ करुन तिजोरी भरत असताना लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर केंद्र सरकारने ३ नोव्हेंबर रोजी केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात करत पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपये कमी केले आहेत. पण दुसरीकडे सेस लावून लोकांची लूट सुरुच आहे. उत्पादन शुल्क कमी केल्यामुळे राज्यांना मिळणारा यातला वाटा कमी होणार आहे. अगोदरच केंद्र सरकारने १ मार्च २०२१ पासून ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत केंद्रीय उत्पादन शुल्कातून मिळणारे राज्य शासनाचे जवळपास ३० हजार कोटी रुपये हडप केले आहेत. केंद्र सरकार इंधनावर सेस वाढवून सामान्य जनतेचे आणि राज्य सरकारांचेही आर्थिक शोषण करत आहे हल्लाबोल नाना पटोले यांनी केला आहे.

First Published on: November 17, 2021 5:35 PM
Exit mobile version