नाशिक : ग्रामीण भागात करोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर त्यांचा वाढता प्रादुर्भाव बघता आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य कसे सुरु आहे, याची माहिती घेण्यासाठी दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी बुधवारी (दि.8) चांदवड, नांदगांव, येवला या तालुक्यांतील तहसीलदार कार्यालय, महत्वाचे पोलिस ठाणे, आरोग्य विभाग, पंचायत समिती, नगर परिषद यांसह अन्य विभागांच्या अधिकारी वर्गाशी सामाजिक अंतर राखत आढावा घेतला. केंद्र सरकारने पाठविलेल्या धान्याचे वितरण अद्यापही झाले नसल्याचे समजते आहे. यंत्रणेमार्फत त्वरित वितरित करण्यात यावे अशा सूचना त्यांनी अधिकार्यांना केल्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच लोक घरात बसून आहेत. अत्यावश्यक सेवा सुरु असताना ग्रामीण भागातील उपाययोजनांचा आढावा घेणे महत्वाचे ठरते. त्यादृष्टीने खासदार डॉ. पवार यांनी अधिकार्यांसोबत आढावा बैठक घेतली. यात प्रामुख्याने आपत्कालीन परिस्थितीत आपण तालुका स्तरावर काय उपाययोजना केल्या आहेत, त्या करत असताना कोणत्या अडचणी येतात, याचीही माहिती घेतली.