रक्षाबंधनानिमित्त महिला मुंबईहून माहेरी येत असताना रिक्षात विसरलेले दागिने सरकारवाडा पोलिसांमुळे परत मिळाले. दागिने हरवल्याने सासरी काय सांगायचे, या विवंचनेत असताना पोलिसांनी अवघ्या काही तासांत शोधून दिल्याने मायलेकींना आश्रू अनावर झाले. दोघींनी पोलिसांचे मन:पूर्वक आभार मानले.
रक्षाबंधनासाठी मनीषा प्रकाश मेहता मुंबईहून शनिवारी (दि.२१) सकाळी ११:३० वाजता माहेरी (नाशिक) आल्या. त्या ठक्कर बझार बसस्टँडला बसमधून उतरून रिक्षा ने कस्तुरबा नगर येथे गेल्या. रिक्षातून उतरल्यानंतर त्या सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली बॅग रिक्षामध्येच विसरल्या. ही बाब लक्षात येताच त्या टेन्शनमध्ये आल्या. आता दागिने हरविल्याने सासरी काय सांगायचे, असा प्रश्न त्त्यांना पडला होता. त्यांना आश्रूही अनावर झाले. त्यांनी कसेबसे सरकारवाडा पोलीस ठाण्यात गाठत दागिने हरवल्याची तक्रार दिली. तक्रार प्राप्त होताच पोलीस उपनिरीक्षक पवार व डी. बी. पथकाने त्र्यंबक नाका सिग्नल या ठिकाणी जाऊन सीसीटीव्ही फुटेज मिळवले. त्याआधारे रिक्षा व रिक्षाचालकाचे फुटेज प्रापत केले. त्यानुसार नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत जाऊन रिक्षाचालकाला शोधून काढले. पोलिसांनी रिक्षाचालकाच्या ताब्यातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली बॅग ताब्यात घेत मनीषा मेहता यांना दिली. दागिने परत मिळाल्याने त्यांच्या जीवातजीव आला. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच पोलीस ठाण्यात आल्या होत्या. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केली.