Kirit Somaiya: सोमय्यांनी हसन मुश्रीफांवर केलेले आरोप बिनबुडाचे – नवाब मलिक

Kirit Somaiya: सोमय्यांनी हसन मुश्रीफांवर केलेले आरोप बिनबुडाचे – नवाब मलिक

भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारमधील अजून एका भ्रष्टाचारी मंत्र्याचे नाव उघड केले. अनिल परब, अनिल देशमुख यांच्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सोमय्यांच्या रडारवर आहेत. हसन मुश्रीफ यांनी मोठ्या प्रमाणात घोटाळे केले असून मुश्रीफ पिता-पुत्रांनी १२७ कोटींची बेनामी व्यवहार केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. सोमय्यांनी असे अनेक आरोप केले असून हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे ते तक्रार दाखल करणार आहेत. एका बाजूला किरीट सोमय्या हसन मुश्रीफ यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे देत असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यासंदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया दिली. किरीट सोमय्यांनी राजकीय हेतूने हसन मुश्रीफांवर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

‘शेवटी सत्यमेव जयते’

नवाब मलिक म्हणाले की, ‘काही दिवसांपासून पुन्हा किरीट सोमय्या सक्रिय झाले आहेत. केंद्र सरकारने त्यांना ४० पोलिसांचा ताफा सुरक्षेकरिता दिलेला आहे. म्हणजे त्यांना धोका नसतानाही सुरक्षा निर्माण करून लोकांमध्ये वेगळं वातावरण निर्माण करण्याचं काम भाजपच्या माध्यमातून केलं जात आहे. आता डर्टी ११ मध्ये ते सांगतायत की, या सरकारमध्ये ११ लोकं भ्रष्टाचारी आहेत. मला वाटतंय राजकीय हेतूने सरकारला बदनाम करण्यासाठी वारंवार त्या पद्धतीने बोलतं राहतायत. आताच्या आरोपात काही तथ्य नाही. मागच्या काळात जे काही आरोप लावले आहेत, त्याच्यातून लोकं दोषमुक्त होत आहेत. सरकारचा वापर करून भुजबळ यांना अटक केली होती आणि गुन्हा दाखल करण्यात आला. पण शेवटी सत्यमेव जयते. सत्य काय आहे ते समोर आलं आणि ते अखेर दोषमुक्त झाले आहे.’

‘लोकांना बदनाम करण्यासाठी हे आरोप होत आहेत’

‘आज त्यांनी हसन मुश्रीफांवर आरोप केला. आमच्या पक्षामध्ये नेते स्वतःचे उद्योग-धंदे करतायत. ते उद्योग-धंदे करण्यासाठी रितसर ज्या काही कायदेशीर परवानगी आहे त्या घेत आहेत. जी जी एजेंसी असेल कॉर्पोरेट अफेयर्स डिपार्टमेंट असेल तिकडे त्यांची नोंद होत असून इन्कम टॅक्स डिपार्टमध्ये ज्या रिटर्न फाईल करायच्या आहेत त्या केल्या जातायत. जे काही असेल त्यामध्ये केंद्रीय यंत्रणेला तपास करण्याचा अधिकार आहे. एखादा कारखाना, कंपनी काम करत असताना जर चुकीचं काही असेल तर त्यांच्या रिफन्डमध्ये रिफलेक्ट होत आहे. त्यापद्धतीने ते कारवाई करू शकतात. विधानसभा निवडणूकीच्या आधी २०१९साली हसन मुश्रीफ यांच्या कारखान्यावर, घरावर आणि ऑफिसवर इन्कम टॅक्सने धाड टाकली होती. त्याच्यातून त्यांना काही मिळालंच नाही. एखादा टॅक्स चुकवला असेल, बेकायदेशीर काम केली असेल तेव्हा एजेंसीला त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार असतो. ही छापेमारी होऊन जवळपास २ वर्ष होऊन गेल्यानंतरही कुठल्या विभागाची कारवाई झाली नाही. आज ज्या पद्धतीने किरीट सोमय्या हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप करत आहेत, हे आरोप बिनबुडाचे आहेत, राजकीय हेतूने करण्यात आले आहेत. लोकांना बदनाम करण्यासाठी हे आरोप होत आहेत,’ असे मलिक म्हणाले.

‘स्वतःची मुलं काय करतं आहेत, याकडे लक्ष द्या’

‘मला वाटतंय सोमय्या यांना कोणी गंभीर घेत नाहीत, स्वतःचा आवाका निर्माण करून लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करणे या प्रकारचा उद्योग सोमय्यांचा आहे. इतराच्या पोरांवर बोट दाखवत असताना स्वतःची मुलं काय करतं आहेत, याकडे लक्ष द्यावं. मुलगा कोणाला फोन करतो? कोणाकडून पैसे मागतो?, कोणाकडून खंडणी वसूल करण्याचं काम घरातील लोकं करतायत? तुमचे नातेवाईक काय करतायत? त्याच्या किती बोगस कंपन्यात आहेत? कसे मनी लाँड्रिंग ते करत आहेत? हे लोकांना माहित आहेत. याआधी नारायण राणे यांच्यावर सोमय्या बोट दाखवत होते. त्यांनी मनी लाँड्रिंग केली होती, आता याबाबत सोमय्या गप्प का?,’ असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.


हेही वाचा – हसन मुश्रीफ कुटूंबीयांचे शेकडो कोटींचे घोटाळे; सोमय्यांचा मनी लाँड्रिंगचा गंभीर आरोप


 

First Published on: September 13, 2021 2:26 PM
Exit mobile version