CBI वर अविश्वास दाखवणारे सत्तेत असणे देशासाठी घातक – शरद पवार

CBI वर अविश्वास दाखवणारे सत्तेत असणे देशासाठी घातक – शरद पवार

पुणे येथील संविधान बचाव रॅलीला संबोधित करताना शरद पवार

“राज्य कुणाचंही असो पण त्याचा वापर जनतेच्या भल्यासाठी व्हायला हवा. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे तेच लोक संविधानावर हल्ले करत आहेत. निःपक्षपाती पद्धतीने चौकशी व्हायला हवी, यासाठी सीबीआय असते. सीबीआय एक स्वतंत्र यंत्रणा आहे. मात्र सीबीआयच्या प्रमुखांना घरी पाठवण्याचा निर्णय मध्यरात्री देशातील राज्यकर्त्यांमार्फत घेण्यात आला. यातून स्पष्ट होते की, आम्ही सांगू तिच पूर्व दिशा असा या सरकारचा कारभार आहे.”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पुण्यातील बालेवाडी येथे राष्ट्रवादीतर्फे संविधान बचाव सभेत ते बोलत होते.

भाजपचा सुप्रीम कोर्टावर विश्वास नाही

सरकारचा हा कारभार देशासाठी घातक आहे. आजच्या राज्यकर्त्यांचा संविधानावर विश्वास नाही. केरळमध्ये सबरीमाला नावाचे मंदिर आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्या मंदिरात महिलांना प्रवेशबंदी होती. काही स्थानिक महिलांनी याबाबतीत सुप्रिम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने महिलांच्या बाजूने निकाल दिला आणि प्रवेशबंदी उठवली. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णायाची अंमलबजावणी करण्यासाठी केरळ सरकारने पुढाकार घेतला ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सहभाग होता. मात्र भाजपचे अध्यक्ष अमित शाह तिथे गेले आणि सांगितले की सुप्रीम कोर्ट असं निर्णय कसं घेऊ शकतं? अमित शाह यांनी घेतलेल्या ता भूमिकेमुळे स्पष्ट होते की न्यायव्यवस्थेने दिलेला निर्णय यांना मान्य नाही. स्त्रीपुरुष समानता यांना मान्य नाही. असे विचार असणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता असणे धोकादायक आहे.

हे देखील वाचा – पवारांच्या तिसर्‍या पिढीचं ठाकरेंना आव्हान

 

दुष्काळाची मोठी झळ स्त्रीयांना

आज राज्यावर दुष्काळी संकट आले आहे. पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती आहे. शेकडो भगिनींना उन्हातान्हात पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. सर्व घटकांना दुष्काळाचा फटका बसतो मात्र महिलांना त्याची झळ जास्त बसते. सरकार अनुकूल निर्णय घेत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यंतरी म्हणाले की छारा छावण्या देणार नाही. आघाडी सरकार असताना आपण लागेल ती मदत शेतकऱ्यांना केली होती मात्र हे सरकार तसं करताना दिसत नाही. चारा नाही पाणी नाही विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत सरकारला त्याकडे लक्ष नाही. हे सरकार सामान्य माणसाला कोणतंही सहाय्य करत नाही. अशा लोकांकडे असलेली सत्ता आपण लोकशाही मार्गाने हिसकावून घेऊ, असा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला.

First Published on: October 29, 2018 4:26 PM
Exit mobile version