‘शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी’

‘शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी शरद पवार हे आज, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितले आहे. दुष्काळ, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, बेरोजगारी, आरक्षण आदी प्रश्नांवर विधानसभेसाठी रान उठविण्याचा राष्ट्रवादीचा इरादा आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची अपेक्षित कामगिरी झाली नसली तरी, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय डावपेच आखणे सुरु केले आहे. शरद पवारांनी दुष्काळी भागाचा दौरा सुरु केला आहे. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. केंद्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच कर्जमाफी करावी, यासाठी आग्रह धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सरकारकडे मोठ्या प्रमाणात धान्याचे साठे उपलब्ध आहेत, दुष्काळग्रस्त भागातील जनतेला सरकारने अन्नधान्याचा पुरवठा करावा, अशी मागणी पवार करणार आहेत.

शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण

राज्यातील फडणवीस सरकारने २०१७ मध्ये दीड लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. ८९ लाख शेतकरी कुटुंबांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची योजना होती. प्रत्यक्षात आजतागायत ३८ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला असून, त्यासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. सुमारे ४३ टक्के शेतकऱ्यांना दीड लाखांच्या सरसकट कर्जमाफी योजनेचा फायदा झाला असून, उर्वरित शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे बोलले जात आहे.


वाचा – ‘काळ कठिण आहे मात्र आपण हरायचं नाही’; शरद पवारांची दुष्काळग्रस्तांना साद

वाचा – पार्थची जागा न येणारीच होती – शरद पवार


 

First Published on: May 27, 2019 10:01 AM
Exit mobile version