करोना चाचणी केंद्र आणि प्रयोगशाळा यांच्या क्षमतेत वाढ करण्याची गरज

करोना चाचणी केंद्र आणि प्रयोगशाळा यांच्या क्षमतेत वाढ करण्याची गरज

करोना विषाणूच्या साथीचा महाराष्ट्र जोमाने मुकाबला करत आहे. सध्या आपण या रोगाच्या दुसऱ्या टप्प्यातील संक्रमण अवस्थेत आहोत. तिसऱ्या टप्प्यात न जाण्यासाठी आपल्याला उपाययोजनांची गती वाढवावी लागेल. विशेषत: चाचणी केंद्रे आणि प्रयोगशाळा यांच्या क्षमतेत वाढ करण्याची गरज आहे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली.

रुग्णांची संख्या कमी दिसत असली तरी

करोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी आज देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ठाकरे यांनी करोनाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूबाबत केलेल्या आवाहनाचा सकारात्मक परिणाम साधला आहे. राज्य सरकारने वेळीच पावले उचलून करोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून प्रयत्न केले आहेत. रूग्णांची संख्या कमी दिसत असली तरी या रोगाच्या फैलावाचे स्वरूप पाहता भ्रमात राहण्यात अर्थ नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आपल्यासमोर करोनाला रोखण्याचे आवाहन

२२ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमाने बंद करण्यात येणार आहेत. तोपर्यंत २० ते २५ हजार प्रवाशी राज्यात, देशात परततील. या प्रवाशांचे क्वारंटाईन करावे लागेल किंवा त्यांच्यावर उपचार करावे लागतील. त्यादृष्टीने सुविधा वाढविण्याची गरज आहे. मुंबई, पुणे, नागपूर या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेले प्रवासी मिळेल त्या वाहनांनी आपापल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतील. त्यांना रोखण्याचे आव्हान आपल्यासमोर असेल, असे ठाकरे म्हणाले.

लष्करी रूग्णालयांची मदत घ्यावी

आज राज्यात सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. परंतु, पुढील काळात क्वारंटाईनसाठी जादा सुविधा लागतील. औषध, व्हेंटीलेटर्सची तसेच उपचारांसाठी रूग्णालयाची गरज भासेल. त्यासाठी प्रसंगी लष्करी रूग्णालयांची मदत घ्यावी लागेल. याविषयी उपाययोजना कराव्यात, अशी विनंती ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली.


हेही वाचा – Coronavirus: पुण्यात अघोषित संचारबंदी; परप्रांतीयांची गावाकडे धाव


 

First Published on: March 20, 2020 9:31 PM
Exit mobile version