हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता गळा कुणी धरला?; निलेश राणेंचा हल्लाबोल

हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता गळा कुणी धरला?; निलेश राणेंचा हल्लाबोल

बीड अ‍ॅसिड हल्ल्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा गळा आता कुणी धरला आहे? असा सवाल करत निलेश राणे यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. बीड अ‍ॅसिड हल्ल्याच्या घटनेचा राज्यभरात निषेध करण्यात येत आहे. भाजपने या घटनेवरुन राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बीड येथे एका तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून जिवंत जळल्याची घटना घडली. या घटनेचा निषेध करताना निलेश राणे राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “बीडमध्ये एका २२ वर्षीय तरुणीला अ‍ॅसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत,” असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

काय आहे प्रकरण

दिवाळीनिमित्त पुण्याहून गावी जाणाऱ्या तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून जिवंत जळल्याची घटना येळंबघाट, बीड येथे घडली. गंभीररित्या भाजलेल्या तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच अशा प्रकारचे निर्दयी कृत्य घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली. दरम्यान याप्रकरणातील आरोपी आणि मयत तरुणी दोघे पुण्यात सोबत (लिव्ह इन रिलेशनशिप) राहत होते अशी माहिती समोर आली आहे.

 

First Published on: November 16, 2020 11:01 AM
Exit mobile version