नारायण राणे यांची खासदारकी रद्द करा – जठार

नारायण राणे यांची खासदारकी रद्द करा – जठार

नारायण राणे यांना भाजपच्या कोट्यातून राज्यसभेची खासदारकी देण्यात आली होती.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. त्यानंतर आपल्या पक्षाचा एनडीएला पाठिंबा असल्याचे सांगत त्यांनी राज्यसभेची खासदारकी मिळवली. भाजपच्या कोट्यातून त्यांना राज्यसभेत पाठवण्यात आले. मग भाजपला सहयोग करणे सोडाच, पण ते उलट पक्षावरच जास्त टीका करत आहेत. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे. भाजपच्या प्रदेश प्रभारी सरोजिनी पांडे यांच्याकडे ही मागणी केली असल्याची माहिती मिळत आहे.

ही मागणी करत असताना प्रमोद जठार यांनी राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राणे यांनी भाजपकडून खासदारकी मिळवली तरी त्यांच्या पक्षाच्या विश्वास यात्रेदरम्यान ते भाजपवर ‘प्रहार’ करत आहेत. पक्षावर उलटणाऱ्यांना पक्षात स्थान असता कामा नये. तसेच यापुढेही त्यांनी टीका सुरुच ठेवली तर त्यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव थेट राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना देऊ, असेही जठार म्हणाले.

कोकणात जठार आणि राणे यांच्यातील वाद नवा नाही. राणे काँग्रेसमध्ये असताना सुद्धा अनेकदा राणे कुटुंबिय आणि जठार यांच्यात खटके उडालेले आहेत. राणे एनडीएत सामील झाल्यानंतर जठार यांची भूमिका काय असणार? याकडे सिंधुदुर्गात उत्सुकत होती. मात्र राणे यांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढल्यानंतर जठार यांना पुन्हा एकदा राणे विरोधी सूर आवळण्याची संधी मिळालेली आहे.

First Published on: December 19, 2018 3:37 PM
Exit mobile version