रस्तेप्रश्नी कोकणातील आमदारांकडून समस्यांचा पाढा; मंत्र्यांकडून फक्त एका वाक्यात उत्तर

रस्तेप्रश्नी कोकणातील आमदारांकडून समस्यांचा पाढा; मंत्र्यांकडून फक्त एका वाक्यात उत्तर

Maharashtra Assembly Budget 2023-24 | मुंबई – कोकणातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मुंबई-गोवा महामार्ग रखडला आहे. तर, गावागावांना जोडणारे रस्तेही खड्डेमय झालेत. कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक, चिपळुणचे आमदार शेखर निकम, गुहागरचे आमदार भास्कर जाधव आणि कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची दुर्दशा मांडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केवळ एका वाक्यात उत्तर दिलं. तुम्ही दिलेल्या सूचनांचा विचार केला जाईल, इतकंच रवींद्र चव्हाण म्हणाले.

“आंबा घाटासाठी साडेतीन हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. या साडेतीन हजार कोटींपैकी सार्वजनिक विभागाला किती वर्ग झाले, किती खर्च झाला? याची माहिती पुरवावी अशी मागणी दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी मागवली. ही माहिती पटलावर ठेवली जाईल,” एवढीच मोघम प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.

“सिंधुदुर्गातील गगनबावडा घाट महत्वाचा घाट. या घाटामध्ये पावसात वाहतूक बंद होती. या कामासाठी निधी मंजूर झाला आहे, पण कंत्राट निघालेलं नाही. त्यामुळे कामाला सुरुवात झालेली नाही. या घाटाचं काम कधी होणार? असा प्रश्न कुडाळ मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला. “या कामाचा निधी उपलब्ध झाला आहे. टेंडर प्रक्रिया लवकरच पूर्ण होतील. पावसाअगोदर काम पूर्ण होईल,” अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा – अणुस्कुरा घाटाचे लवकरच रुंदीकरण, अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद

मार्लेश्वर हे पर्यटन स्थळ आहे. येथील रस्त्यासाठी हम योजनेअंतर्गत निधी मंजूर केला होता. परंतु, या कामाला स्थगिती दिली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हा रस्ता होणे गरजेचं आहे. तसंच, कुंडी आणि नायरी घाट फोडण्यासाठी ५ कोटींचा निधी मंजूर झाला होता. पण हे घाट फोडण्याचे काम सुरू झाले नाही. हे काम तातडीने होणार का? असे प्रश्न चिपळूण मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी उपस्थित केले होते. “या सर्व सूचनांचा विचार केला जाईल,” एवढीच प्रतिक्रिया रवींद्र चव्हाणांनी दिली.

“महाविकास आघाडीच्या काळात सरकारने अडीच वर्षांत निधी दिला नाही. पण गेल्या सात महिन्यांत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून भरघोस निधी देण्यात आलाय. गगनबावडा घाटासाठी अडीचशे कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पावसाळ्याआधी हे काम होणार आहे. तसंच, कोकणात वाडीजोड रस्ते असतात, दोन वाड्या जोडण्यासाठी ४० कोटींची मागणी आम्ही करत आहोत, त्याचा विचार केला जावा, अशी विनंती कणवकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी केली. “यासंदर्भात नक्की विचार केला जाईल,” अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली.

सर्वांत महत्त्वाची मागणी गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी केली. कोकणात मोठ्याप्रमाणात अतिवृष्टी होते. त्यामुळे रस्ते खराब होतात. रस्त्यांकरता, पुलांकरता पैसे मिळावे ही मागणी असते. कोकणात प्रत्येक मतदारसंघाप्रमाणे रस्त्यांकरता ५० किमीचं टार्गेट अपग्रेड करूया. तसंच,कोकणासाठी दोनशे किमीचे रस्ते टार्गेट करण्याची विनंती भास्कर जाधव यांनी केली. त्यावर, सर्व सूचनांचा सरकार म्हणून विचार करू, इतकीच एका वाक्यात रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.

First Published on: March 2, 2023 1:22 PM
Exit mobile version