रोहित पवारांच्या कामात अहिल्याबाईंच्या दृष्टिकोनाचा स्पर्श दिसतो – शरद पवार

रोहित पवारांच्या कामात अहिल्याबाईंच्या दृष्टिकोनाचा स्पर्श दिसतो – शरद पवार

रोहित पवारांच्या कामात अहिल्याबाईंच्या दृष्टिकोनाचा स्पर्श दिसतो - शरद पवार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ चौंडी येथे अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शरद पवार हजर होते. यावेळी बोलताना त्यांनी अहिल्यादेवींचे काम हे सर्वसमावेशक प्रकारचे होते. परिवर्तनाला प्रोत्साहन देणारे होते असे सांगितले. त्यांनी यावेळी नातू आमदार रोहीत पवार यांचे कौतूक केले.

अहिल्यादेवींचे काम सर्वसमावेशक होते –

अनेक मान्यवर महिला या देशात होऊन गेल्या. पण साधारणत: तीन महिलांची आठवण देशात ठिकठिकाणी काढली जाते. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर. जिजामातेने शिवाजी महाराजांना अन्यायाविरुद्ध लढायला एक आत्मविश्वास दिला. सावित्रीबाईंनी शिक्षणाचे दरवाजे मुलींसाठी खुले केले आणि अहिल्यादेवींनी एक वेगळे काम केले ते काम म्हणजे कौटुंबिक संकट आल्यानंतर सुद्धा राज्यशकट हातामध्ये घेत त्यांनी प्रशासनाच्या संदर्भातील एक आदर्श देशासमोर ठेवला, असे खासदार शरद पवार म्हणाले.

समाजामधील चुकीच्या प्रथा थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, हुंडाबंदीमध्ये लक्ष घातले, विधवांना सन्मानाने जगता यावे यासाठी निर्णय घेतले, कन्यादानाच्या संदर्भातील निर्णय घेतला. सर्व जातीधर्मातील लोकांना घेऊन राज्य चालवण्यासाठी सर्वधर्मसमभावाची संकल्पना त्यांनी कृतीमध्ये आणली. प्रशासनाचा अधिकार आल्यानंतर ते प्रशासन कसे चालवायचे याचा आदर्श अहिल्यादेवींनी संपूर्ण देशासमोर ठेवला. सावित्रीबाईंचे काम एका वेगळ्या दिशेने होते. जिजामातेचे काम वेगळ्या पद्धतीचे होते आणि अहिल्यादेवींचे काम हे सर्वसमावेशक अशा प्रकारचे होते. परिवर्तनाला प्रोत्साहन देणारे होते, असेही शरद पवार म्हणाले.

नातू रोहीत पवार यांचे कौतूक –

यावेळी त्यांनी नातू आमदार रोहीत पवार यांचे कौतूक केले. हा सर्व भाग हा महाराष्ट्रातील दुष्काळी भाग आहे. कर्जत जामखेड परिसरातील दुष्काळाचे दुखणे फार जुने आहे. उद्योगाचा प्रश्न सुटलेला नाही. मला आनंद एका गोष्टीचा आहे की इथल्या जनतेने निवडणुकीमध्ये रोहितसारख्या एका तरूण कार्यकर्त्याला चांगल्या पद्धतीने निवडून दिले. त्याच्या हातामध्ये कामाची संधी दिली. मागील दोन अडीच वर्षात अनेक कामे अशी झाली आहेत ज्यामध्ये अहिल्याबाईंच्या दृष्टीकोनाचा स्पर्श दिसावा.

इथल्या लोकांना त्यांची अपेक्षा विचारली तर ते फक्त पाणी सांगतात. रोहितने जबाबदारी घेतल्यानंतर संबंधित विभागाच्या मंत्र्यांना भेटून पाणी इथे कसे आणता येईल यासंबंधी अनेकदा बैठका घेतल्या. माझी खात्री आहे की येत्या कालखंडात पाण्याचा प्रश्न सोडविण्याची सुरुवात इथे पाहायला मिळेल.आज अहिल्यादेवींचे स्मरण करताना तुमच्या तरूण आमदाराने इथे उद्योग वाढावेत यासाठी इथे एमआयडीसी कशी होईल याकरता उद्योग मंत्र्यांसोबतही बैठका घेतल्या, जमिनीची निवड केली आणि या भागात एमआयडीसी येईल, कारखाने उभे राहतील याची पूर्ण तयारी याठिकाणी केली आहे.

दोन अत्यंत महत्वाचे महामार्ग या भागासाठी मंजूर –

अहिल्यादेवींनी आपल्या राजवटीत दळणवळणाच्या गोष्टींकडे लक्ष केंद्रीत केले होते. अनेक ठिकाणचे रस्ते केले. मी बघतोय की रोहितने जबाबदारी घेतल्यानंतर दोन अत्यंत महत्त्वाचे महामार्ग या भागासाठी मंजूर झाले. त्यांच्या कामाची प्रत्यक्षपणाने सुरुवात झाली. त्यामुळे रस्ते, पाणी वा रोजगार असो, हा दृष्टीकोन जो अहिल्यादेवींनी ठेवला होता, आज नेमके तेच सूत्र नजरेपुढे ठेवून तुमचा आमदार या भागामध्ये काम करतोय याचा मला मनापासून आनंद आहे. विकासाची गंगा या भागात यावी याची काळजी घेणे हे त्यांचे कर्तव्य म्हणून ते काम करत आहेत. पण या कामात तुम्हा सगळ्यांचे सहकार्य आणि साथ त्यांना मिळावी, अशी विनंती करतो. पाच वर्षांच्या काळामध्ये तुमचे सामुदायिक प्रयत्न यशस्वी झाले तर कर्जत जामखेडचा चेहरा बदलायचा हा इतिहास इथे घडवला जाईल, अशी अपेक्षा मी व्यक्त करतो, अशा शब्दात त्यांनी रोहीत पवार यांचे कौतूक केले.

First Published on: May 31, 2022 7:00 PM
Exit mobile version