उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर सापडलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ तसंच मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी NIA च्या ताब्यात असलेले सचिन वाझे यांचं एक खळबळजनक पत्र समोर आलं आहे. यामध्ये त्यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नियुक्तीसाठी दोन कोटी रुपये मागितले, असा आरोप केला आहे. वाझे यांनी त्यांच्या पत्रात महाविकास आघाडीच्या दोन मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. वाझे यांनी NIA च्या कस्टडीत बसून त्यांच्या वकिलांसमोर हे पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. वाझे यांचं निलंबन झालं तेव्हा स्वत: देशमुख यांनी त्यांना फोन केला होता. यावेळी परत सेवेत घेण्यासाठी गृहमंत्र्यांनी दोन कोटी रुपये मागितले, असा आरोप वाझेंनी केला आहे. एकूण चार पानांचं हे पत्र आहे.
सचिन वाझेंनी परिवहन मंत्री अनिल परब यांचं देखील पत्रात नाव घेतलं आहे. अनिल परब यांनी त्यांच्या शासकिय निवासस्थानी बोलवून ५० कॉन्ट्रॅक्टरकडून प्रत्येकी २ कोटी घेण्याचे आदेश दिले होते, असं वाझेंनी पत्रात म्हटलं आहे. तसं सचिन वाझेंनी त्यांच्या पत्रात अजित पवार यांचं देखील नाव घेतलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुटखा घोटाळ्याच्या चौकशीला विरोध केल्याचं वाझेंनी पत्रात म्हटलं आहे. मी सेवेत आल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार आणि पब आस्थापनांकडूनही वसुली करण्याचे टार्गेट दिलं होतं, असा खुलासा सचिन वाझेंनी लेटरबॉम्बमध्ये केला आहे. परमबीर सिंग यांचं पत्र आणि वाझेंचं पत्र यात साम्य दिसतंय.
सचिन वाझे यांच्या पत्रावरून आता न्यायालयाने सीबीआयला आदेश दिले आहेत. या पत्राची सत्यता तपासून कारवाई करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. आता या प्रकरणी एनआयए बरोबरच सीबीआयकडूनही प्रत्यक्षरित्या तपासाला सुरूवात होणार आहे. इतकंच नाही तर सबंधित पत्रावरून मॅजिस्ट्रेट समोर वाझेंचा जबाब ही नोंदवण्यात आला आहे. लिहिलेल्या पत्रावरून वाझेंनी घुमजाव करू नये यासाठीही खबरदारी घेण्यात आली आहे.