‘ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण, त्यामुळे सरकार गेल्याशिवाय कोरोना जाणार नाही’

‘ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण, त्यामुळे सरकार गेल्याशिवाय कोरोना जाणार नाही’

रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी काल, रविवारी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची भेट घेतली. या भेटीनंतर खोत यांनी माध्यमांशी संवाद साधून ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. घरात बसूनचं मुख्यमंत्री राज्याचा कारभार हाकत आहेत. प्रत्यक्षात काय सुरू आहे त्यांना दिसत नाही आहे. या ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हे सरकार गेल्याशिवाय कोरोना जाणार नाही, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

सदाभाऊ यांनी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपुस केली आणि त्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी दूध दरवाढ, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर सडेतोड टीका केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ५० हजार रुपये नुकसान भरपाई देऊ अशी पोकळ घोषणा युती सरकारच्या काळात त्यांनी केल्या होत्या. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडायला तयारच नाही आहेत. कोरोनाचे भूत घेऊन ठाकरे सरकार सर्वत्र हिंडत आहे. मोर्चे, आंदोलनावर बंदी घातली जात आहे. खरंतर ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हे ठाकरे सरकार गेल्याशिवाय कोरोना जाणार नाही, असा टोला सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

दरम्यान दूध दरवाढीचा प्रश्न ऐरणीवर असून त्यासंबंधी कायम स्वरुपी मार्ग निघायला पाहिजे. रोज राज्यात २ कोटी लीटर दूध संकलन होते, त्यामध्ये ३० टक्के सहकारी संस्था तर २० टक्के दूध खासदार कंपन्या खरेदी करतात. यात खासगी कंपन्यांचे मोठे रॅकेट तयार झाले असून सत्ताधारी लोकांचे हे रॅकेट आहे. त्यामुळे सध्या काहीकाळ दर वाढवायचा आणि पुन्हा कमी करायचा, असा प्रकार सुरू आहे, असे खोत म्हणाले.

First Published on: June 21, 2021 1:12 PM
Exit mobile version