साई दरबारी भिक्षा झोळीसाठी भाविकांची मांदियाळी

साई दरबारी भिक्षा झोळीसाठी भाविकांची मांदियाळी

शिर्डी – श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस आज अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात साजरा झाला. साईभक्तांच्या मांदियाळीने शिर्डी नगरी फुलून गेली होती. या ४ दिवसीय उत्सवानिमित्त साई समाधीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलीय. दसरा अर्थात विजयादशमीच्या दिवशी दुपारी अडीच वाजता साईबाबांचं महानिर्वाण झालं होतं. त्यामुळे साईभक्तांसाठी या दिवसाचं अनन्यसाधारण महत्व आहे.

साईबाबा दररोज पाच घरी जाऊन भिक्षा मागायचे आणि जमा झालेल्या भिक्षेतून गोरगरीब आणि भुकेल्यांना अन्नदान करायचे. १९१८ साली दसऱ्याच्या दिवशीच साईबाबांनी आपला देहत्याग केला होता. साई संस्थानने आजही भिक्षाझोळीची परंपरा जपलीय. दसऱ्याच्या दिवशी साई संस्थानच्या वतीने परंपरेप्रमाणे शिर्डी गावातनं साईबाबांचं निशाण आणि भिक्षा झोळी समकालीन भक्तांच्या घरांसह शिर्डी गावातून फिरवली जाते. . यावेळी शिर्डी ग्रामस्थ ठिकठिकाणी पूजा करत भिक्षा झोळीत धान्य स्वरूपात भिक्षा जमा करतात. याच भिक्षेतून साई प्रसादालयात भाविकांना अन्नदान केलं जातं. मात्र यंदा कोरोना संकटामुळे या उत्सवावर अनेक निर्बंध आहेत. साई मंदिरात दररोज १५ हजार भाविकांना ऑनलाईन पासच्या माध्यमातून दर्शनाची व्यवस्था करण्यात आलीय. तर भिक्षा झोळीचा कार्यक्रमदेखील प्रतिकात्मक स्वरूपात साजरा केला जातोय आला. यासाठी साई संस्थानच्या वतीनं चावडी आणि द्वारकामाई परिसरात भिक्षा जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

या ठिकाणी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळात शिर्डी ग्रामस्थांसह देश-विदेशातून आलेल्या साईभक्तांनी भिक्षा झोळीत तांदूळ व गहू भिक्षा स्वरूपात अर्पण केले. साईबाबांना भिक्षा देण्याएवढे आम्ही मोठे नाहीत, मात्र या कार्यक्रमात सहभागी होऊन आजही साईबाबांच्या सानिध्यात असल्याची अनुभूती मिळत असल्याची प्रतिक्रिया अनेक साईभक्तांनी यावेळी व्यक्त केली.

First Published on: October 15, 2021 4:25 PM
Exit mobile version