मराठा आरक्षण : दोन महिने उलटूनही सरकार उदासीन

मराठा आरक्षण : दोन महिने उलटूनही सरकार उदासीन

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल चांगलीच नाराजी व्यक्त केलीय. १६ जूनला कोल्हापुरात मूक आंदोलन झालं होतं. आंदोलनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विनंती करत चर्चेला बोलावलं होतं. त्यावेळी आरक्षण सोडून जे प्रश्न आहेत ते १५ दिवसांत सोडवण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. आता या आश्वासनाला २ महिने उलटूनही काहीही हालचाली झालेल्या नाहीत, अशा शब्दांत खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त केली.

नांदेडला झालेल्या मूक आंदोलनातून जनभावना दिसून आल्या. मुख्यमंत्र्यांना याबाबत मेल केलेला आहे. रिव्ह्यू पिटीशन दाखल केलेली आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. भोसले समितीचा अहवाल मिळाला, मात्र पुढे काय, अॅक्शन प्लॅन काय, हे ठरलेलं नाही, असं सांगतानाच खासदार संभाजीराजेंनी, तुम्हाला असामान्य परिस्थिती निर्माण करायची आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित केला.

नवीन एक आयोग स्थापन करण्याची माहिती समोर आली आणि ती मी पाहिली. मात्र, आम्ही आणखी दोन वर्षं थांबायचं का? सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी दुर्दैवाने काहीही केलं जात नाहीये. सिलेक्शन झालेल्या आणि नियुक्त्या झालेल्या मुलांचा दोष काय? ज्यांना एईबीसी मिळालं नाही ते परत ईडब्ल्यूएसमध्ये जाणार, मग पुन्हा ते कोर्टात जाणार. यावर तोडगा काढा म्हटल्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल असं सांगतात. ओबीसींप्रमाणे मराठा समाजाला सवलती देण्याची मागणी केली तर त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याची खंतही खासदार संभाजीराजेंनी व्यक्त केली.

First Published on: September 8, 2021 10:57 PM
Exit mobile version