सरकारमध्ये कोणी महाराष्ट्रप्रेमी उरलं असेल तर…, संजय राऊतांचं आवाहन

सरकारमध्ये कोणी महाराष्ट्रप्रेमी उरलं असेल तर…, संजय राऊतांचं आवाहन

मुंबई – सरकारमध्ये कोणी महाराष्ट्रप्रेमी उरलं असेल तर त्यांनी आजच्या महामोर्चात सामील व्हा, असं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना केलं. तसंच, त्यांचं महाराष्ट्रप्रेम खोक्याखाली दबून गेलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली. आजचा महामोर्चा हा विराट होणार आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मोर्चा जसा विराट व्हायचा, तसाच हा मोर्चा होईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. आज त्यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गळ्यात भगव्यासह निळा गमछाही घातला होता.

हेही वाचा – अमोल मिटकरींकडून भाजपा नेत्यांना आव्हान, ‘तो’ फोटो शेअर केल्यास देणार एक लाख रुपये

महामोर्चामुळे घणाघात होणार आहे या कल्पनेने सरकारचे पाय लटपटू लागले. म्हणून मोर्चाला परवानगी देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. परवानगी देऊन १३ अटी शर्थी घालण्यात आल्या. महापुरुषांचा अवमान महाराष्ट्रात होत आहे, याविरोधात महाराष्ट्रप्रेमींच्या मोर्चाला अटी घालता? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. परवानगी देताना पोलिसांनी भाषणं करण्यास मनाई केली आहे. यावरूनही राऊतांनी हल्लाबोल केला. ‘`भाषणं तुम्हीच लिहून द्या. मुख्मयंत्र्यांना भाषण लिहून दिलं जातं, तसंच, विरोधी पक्षांनाही भाषण लिहून द्या. पण आमचा आवाज कोणी दाबू शकणार नाही. सरकारमध्ये कोणी महाराष्ट्र प्रेमी उरले असतली त्यांनी सामील व्हावं. पण त्यांचं महाराष्ट्रप्रेम खोक्याखाली दबून गेलं आहे. हा मोर्चा विराट होणार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या मोर्चाप्रमाणे होणार आहे, असं संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री ज्या ठाण्यातून येतात ते ठाणे बंद आहे. मुख्यमंत्री त्यांचं शहर स्वतःच बंद करतात हे मी पहिल्यांदाच पाहिलं.यांच्या डोक्यात गांडूळाचा मेंदू आहे, तो नुसता वळवळत असतो. विचारांचा प्रतिवाद विचारांनी करा. उत्तर द्या. वारकरी संप्रदायातील गट पकडून आमच्याकडे सोडून दिले. तुमचं सरकार घटनाबाह्य असलं तरही तुम्ही सत्तेवर आहात, त्याचं भान ठेवा. प्रगल्भता दाखवा आणि आता प्रौढ झालो आहोत हे दाखवा. बंद कसले करता. शिवरायांचा अपमान झाल्याप्रकरणी महाराष्ट्र बंद करायला हवा होता. पण सध्या आम्ही तो बंद पुढे ढकलला आणि मोर्चा आयोजित केला. मुख्यमंत्र्यांची ताकद फक्त तीन हात नाका बंद करण्याएवढीच आहे. तो बंद थांबवून आमच्या मोर्चात सहभागी व्हा, असं आवाहनही त्यांनी केलं.

हेही वाचा – महाराष्ट्रप्रेमींच्या मोर्चात आडवे याल तर याद राखा, ठाकरे गटाचा इशारा

छत्रपती शिवाजी महाराजांच अपमान करणारा माणूस राजभवनात बसलाय. शिवाजी महाराजांच्या अपमानावर आवाज उठवणं म्हणजे काम नाही. झालंय काय तुमच्या मुख्यमंत्र्यांना. आम्हाला काम आहे, स्वाभिमान आहे. तुम्ही लाचार आहात, मिंधे आहात म्हणून तुम्ही अपमान सहन करताय, असा हल्लाबोलही राऊतांनी केला.

भाजपाकडून आज माफी मांगो आंदोलन पुकारण्यात येत आहे. याबाबतही राऊतांनी भाजपावर टीकास्त्र डागलं. सत्तेत असताना कोणाची माफी मागत आहात? आधी महाराष्ट्राची माफी मागा. शिवाजी महाराज, आंबेडकरांचा अपमान रोज करताय. तुम्हीच माफी मागितली पाहिजे, असं राऊत म्हणाले.

First Published on: December 17, 2022 10:16 AM
Exit mobile version