देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने दोन दिवसीय संसदीय अधिवेश बोलवा संजय राऊत यांनी म्हटले आहे. परंतु शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दल आज जे वर्णन केले आहे तशी गंभीर स्थिती महाराष्ट्रात असून त्याबद्दल चर्चा करण्यासाठी लोकसभेचे नव्हे तर विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याचा सल्ला त्यांनी आपल्या राज्य सरकारला द्यावा, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोरोनाच्या साथीबद्दल बोलताना बेड नाहीत, ऑक्सिजन नाही आणि लसीकरणही नाही, नुसता गोंधळ आहे, असे ट्वीट आज सकाळी केले आहे. ही अभूतपूर्व स्थिती आहे आणि युद्धजन्य परिस्थिती आहे, सगळीकडे नुसता गोंधळ आणि तणाव आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे हे म्हणणे अचूक आहे पण ते महाराष्ट्राच्या स्थितीचे वर्णन आहे. संपूर्ण देशात अशी स्थिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थितीबद्दल चर्चा करायला थेट लोकसभेचे अधिवेशन बोलावण्याची त्यांची सूचना सध्या तरी योग्य नाही.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असती तर तसे करणे योग्य झाले असते. सध्या तरी महाराष्ट्रातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करणे योग्य होईल. संजय राऊत हे शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारचे एक शिल्पकार आणि या सरकारचे आवाज आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या सरकारला या प्रमाणे विशेष अधिवेशनाचा सल्ला द्यावा. असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. यावेळी सरकारने सर्व पारदर्शक परिस्थिती जनतेसमोर मांडावी, यासाठी तातडीने विधानसभा सत्राचे आयोजन करून सर्व आमदारांच्या समोर राज्यसरकारने सत्य परिस्थिती मांडावी, अशी मी मागणी करतो. pic.twitter.com/TYlf6SUC10
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 19, 2021