आम्हाला दिलेल्या प्रत्येक त्रासाची किंमत भाजपला चुकवावी लागेल; संजय राऊतांचा इशारा

आम्हाला दिलेल्या प्रत्येक त्रासाची किंमत भाजपला चुकवावी लागेल; संजय राऊतांचा इशारा

महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांचा अमर्याद गैरवापर सुरु आहे. या तपास यंत्रणांच्या मदतीने ज्या पद्धतीने त्रास दिला जात आहे त्या प्रत्येक त्रासाची किंमत भाजपला चुकवावी लागेल, असा इशारा शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. तसंच, शरद पवार जे बोलले आहेत ते त्यांची चिड संताप वेदना आहे. ही सगळ्यांचीच वेदना आहे. आमच्या मनात एक राग आहे. महाराष्ट्रात आम्ही जे महाविकास आघाडी सरकार बनवलं ते याच चिडीतून बनवलं, असं राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी मुंबईत गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. सत्तेसाठी काहीही करायचं. केंद्रीय तपास यंत्रणांचा जो अमर्याद गैरवापर सुरु आहे, खासकरुन महाराष्ट्रात, हे लोकशाही संकेताला धरुन नाहीत. शरद पवारांनी सांगितलं ना याची किंमत चुकवावी लागेल. नक्कीच याची किंमत चुकवावी लागेल. या देशाची जनता कधीच कोणाला माफ करत नाही. इंदीराजींच्या काळात देखील पाहिलं. आम्ही सगळेच प्रमुख लोकं, पवार कुटुंबीय, अनिल देशमुख तुरुंगात आहेत, छगन भुजबळांना क्लीन चिट मिळाली आहे. मग त्यांनी इतका काळ तुरुंगात घालवाल त्याचं काय? त्याची भरपाई कोण करणार? असा सवाल राऊत यांनी केला.

आमचे अनिल परब आहेत, प्रताप सरनाईक आहेत. आम्हीच तुम्हाला दिसतोय का? तुमच्या पक्षामध्ये, तुमचा चमचा मंडळ आहे. त्यामध्ये सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत? असा सवाल करत आम्ही तुम्हाला घाबरत नाही, कारण आमचं काहीच पाप नाही, असं रोखठोकपणे राऊत यांनी सांगितलं. तुम्ही पापी लोकं, बुरखे घालून फिरता इथे. आमच्यावर आरोप करताय, चिखलफेक करताय. याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. मी याआधी देखील म्हटलं आहे, आम्ही जो त्रास भोगलेला आहे त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. नियती कुणाला माफ करत नाही, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला.

परमबीर सिंह यांना केंद्राने पळवून लावलं

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना न्यायालयाने फरार घओषित केलं आहे. यावर बोलताना राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. ज्या व्यक्तीने राज्याच्या गृहमंत्र्यावर भन्नाट आरोप केले आणि आज तो बेपत्ता आहे, त्याला फरार घोषित करावा लागलं. तो कुठे आहे कुणाला माहित नाही. ते देशातून पळून गेले असतील तर केंद्रीय सरकारच्या मदतीशिवाय कोणीही देशाच्या सीमा, मग हवाई, समुद्र मार्ग किंवा रस्त्याच्या सीमा पार करु शकत नाही. तुम्ही आमच्यावर आरोप करुन परमबीर सिंह यांना पळवून लावलं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केला.

 

First Published on: November 18, 2021 11:08 AM
Exit mobile version