मंदिर उघडण्याची मागणी करणाऱ्या लोकांनी तारतम्य बाळगावे, शरद पवारांचा भाजपला टोला

मंदिर उघडण्याची मागणी करणाऱ्या लोकांनी तारतम्य बाळगावे, शरद पवारांचा भाजपला टोला

राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी भाजप- मनसेकडून करण्यात येत आहे. मंदिर उघडण्यासाठी दोन्ही राजकीय पक्षांकडून मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं आहे. मात्र केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यातील मंदिरे अजुनही बंद ठेवली असल्यामुळे केंद्र सरकारच्या विचारांच्या लोकांनी तारतम्य बाळगावे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्राच्या संपर्कात असून त्यानुसार उपाययोजना करत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या विचाराचे जे लोक राज्यात आहेत त्यांनी तारतम्य ठेवले पाहिजे असे वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांना मंदिर उघडण्याबाबत प्रश्न करण्यात आला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन केली आहेत. यावर शरद पवार यांनी भाष्य केलं असून विरोधी पक्षाला चांगलाच टोला लगावला आहे. केंद्र सरकारने कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. त्यामध्ये खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मार्गदर्शक सुचनांचे कटाक्षाने पालन करत आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्राच्या विचाराच्या लोकांनी तारतम्य बाळगावे असा टोलाच शरद पवार यांनी विरोधकांना लगावला आहे.

शोतकरी मेताकुटीला

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी मागील १४ महिन्यांपासून आंदोलन करत आहे. राज्यकर्ते संवेदनशील असतील तर त्यांनी शेतकऱ्यांची नोंद घ्यायला हवी होती. अन्नदात्याकडे केंद्र सरकारचे पुर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची टीका शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

ईडीचा गैरवापर

केंद्र सरकार केंद्गिय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. महाराष्ट्रातच नाही तर पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल अशा राज्यांमध्ये तपास यंत्रणांद्वारे तेथील राजकीय नेत्यांना त्रास देण्यात येत आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील सुरु असलेल्या ईडी आणि सीबीआयच्या कारवाईवर शरद पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ईडीचा गैरवापर करुन विरोधकांना नमवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असून असा गैरवापर यापुर्वी कधीही झाला नव्हता असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा :  जरा धीर धरा, मंदिर उघडण्याच्या मागणीवरुन मुख्यमंत्र्यांनी भाजप-मनसेला फटकारले


 

First Published on: September 5, 2021 3:14 PM
Exit mobile version