संजय राऊतांवरील हक्कभंग प्रस्तावावरून शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…,

संजय राऊतांवरील हक्कभंग प्रस्तावावरून शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…,

संग्रहित छायाचित्र

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोरमंडळ संबोधल्याने विधानसभा आणि विधान परिषदेत मोठा गदारोळ झाला. यावरून हक्कभंग प्रस्ताव आणला गेला असून त्यासाठी विशेषाधिकार समिती गठीत करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले शरद पवार?

कोल्हापुरात खासदार श्री. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ‘ही जी बनावट शिवसेना आहे, डुप्लीकेट, चोरांचं मंडळ, चोरमंडळ, हे विधिमंडळ नाही चोरमंडळ आहे.’ हे विधान केले. यावर विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्याबद्दल हक्कभंग प्रस्ताव मांडला गेला आहे. लोकशाही व्यवस्थेतील विधिमंडळ हे जनतेचे सर्वोच्च प्रतिनिधी मंडळ आहे आणि त्याची मान-प्रतिष्ठा राखली गेलीच पाहिजे. यात दुमत असण्याचे कारण नाही. मात्र संजय राऊतांवरील प्रस्तावित हक्कभंगाच्या कारवाईबाबत नव्याने गठीत केलेली हक्कभंग समिती स्वायत्त व तटस्थ स्वरूपाची असणे अपेक्षित होते.

तसेच गठीत केलेल्या समितीत ठाकरे गटातील आमदारांचा समावेश नाही. हे योग्य नाही. श्री. संजय राऊत यांचे विधान ऐकले असता त्यांच्या म्हणण्याचा रोख दिसून येतो. हे विधान मूलत: विशिष्ट गटाविषयी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आहे. श्री. संजय राऊत यांनी जे विधान केले त्या विधानाचा विग्रह न करता ते एकत्रितरित्या वाचले अथवा ऐकले असता विधानाचा अन्वयार्थ स्पष्ट होतो.

यापूर्वी वसंतदादांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील सरकारवर ‘अलीबाबा-चाळीस चोरांचे सरकार’ अशी टीका-टिप्पणी विरोधकांकडून झाली होती. अशा प्रकारची टीका विधिमंडळाबाबत कधी ही समर्थनीय नाही. परंतू प्रकरण संयमाने हाताळावयास हवे.

श्री. संजय राऊत यांनी केलेले विधान विधिमंडळाबाबत होते की विशिष्ट गटाबद्दल होते याचा त्यांनी केलेल्या विधानाचा एकत्रितरित्या विचार व्हावा याकरता हक्कभंग समितीतील सदस्य नि:पक्षपाती, ज्येष्ठ असावेत याबाबत आवश्यक काळजी घ्यायला हवी होती.

First Published on: March 2, 2023 12:54 PM
Exit mobile version