‘त्या व्यक्तीमुळे पवार साहेबांची पावसातली सभा झाली’; सुप्रिया सुळेंनी उघडलं गुपीत

‘त्या व्यक्तीमुळे पवार साहेबांची पावसातली सभा झाली’; सुप्रिया सुळेंनी उघडलं गुपीत

साताऱ्यात भर पावसात पार पडलेल्या सभेतील शरद पवारांचा फोटो

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साताऱ्यातील पावसातली सभा सर्वांना ज्ञात आहे. या सभेनं राज्यातील राजकारणच बदलून गेलं. मात्र ही सभा पावसात कशी झाली?, याचं गुपीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उघडलं. त्या एका व्यक्तीमुळे साताऱ्यातील सभा पार पडली, असा खुलासा सुप्रिया सुळेंनी केला. नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

साताऱ्यात दीड वर्षापूर्वी पार पडलेल्या सभेला शरद पवार जबाबदार नाहीत, तर शशिकांत शिंदे जबाबदार आहेत, असं खुलासा सुप्रिया सुळे यांनी केला. “साताऱ्यात पावसात पार पडलेल्या सभेला साहेब जबाबदार नाही आहेत. तर व्यासपीठावर बसलेला एका व्यक्ती आहे. त्याचं नाव शशिकांत शिंदे आहे. त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता. साताऱ्यात त्यावेळी जोरदार पाऊस होता. त्यामुळे सभा रद्द करण्याचा विचार सुरु होता. संध्याकाळी मला त्यांचा फोन आला. परंतु मी प्रचार असल्यामुळे त्यावेळी फोन घेतला नाही. त्यानतर पुन्हा एकदा त्यांचा फोन आला. तेव्हा त्यांनी ताई मी सॉरी बोलायला फोन केला आहे. मला सॉरी कशाला बोलता? त्यावेळी त्यांनी सांगितलं की ताई सभा झाली, पवार साहेब पूर्ण भिजले. मी कपाळाला हातच लावला. मी म्हणलं, अहो असं काय करताय. माझे वडील ८० वर्षांचे, पायाला जखम झाली आहे. तेव्हा ते म्हणाले मी आणि साहेबांनी ठरवलं की सभा करायचीच. मग काय झालं असं विचारल्यावर ते म्हणाले की, काही नाही सभा झाली. साहेब भिजले! आता साहेब तयार झालेत आणि माझ्या वाढदिवसाचा केक कापतोय आणि फोटो पाठवतो. हे सगळं ऐकून मी पूर्ण शॉक होते,” असा किस्सा सुप्रिया सुळे यांनी सांगितला.

…उमेदवाराच्या निवडीत माझ्याकडून चूक झाली

साताऱ्यात १८ ऑक्टोबर २०१९ ला भरपावसात शरद पवारांची सभा पार पडली. यावेळी शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या निवडीत माझ्याकडून चूक झाली, असं म्हटलं होतं. “चूक झाली तर ती चूक कबुल करायची असते. लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या निवडीत माझ्याकडून चूक झाली. हे मी जाहीरपणे साताऱ्यात कबूल करतो. ती चूक दुरुस्त करण्यासाठी साताऱ्यातील घराघरातील तरुण, वडिलधारी सगळेजण मतदाना दिवशीची वाट पाहात आहेत. ते मतदानाच्या दिवशी आपल्या मताचा निर्णय घेऊन श्रीनिवास पाटलांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील. यातून सातारकर आम्ही लोकांनी जी काही चूक केली त्याबाबत जो निर्णय घ्यायचा तो घेतील,” असं शरद पवार पावसातल्या त्या भाषणात म्हणाले होते.


हेही वाचा – अमिताभ बच्चन-अक्षय कुमार यांच्या सिनेमाच्या शूटिंगला आम्ही सुरक्षा देऊ – रामदास आठवले


 

First Published on: February 19, 2021 9:28 PM
Exit mobile version