कोणतेही सरकार आनंदाने लॉकडाऊनचा निर्णय घेत नाही – संजय राऊत

कोणतेही सरकार आनंदाने लॉकडाऊनचा निर्णय घेत नाही – संजय राऊत

देशासह राज्यात कोरोनाचा उद्रेक होताना दिसतोय. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात ८ एप्रिलपासून ते ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील भाष्य केले. कोणतेही सरकार आनंदाने लॉकडाऊनचा निर्णय घेत नाही असे संजय राऊत आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

”कोणतेही सरकार आनंदाने लॉकडाऊनचा निर्णय घेत नाही, ही एक आपतकालीन परिस्थिती आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला. देशभरातल्या राज्या-राज्यातल्या विरोधी पक्षांनी लक्षात घेऊन त्या त्या सरकारशी ते राज्यातील असो मग केंद्रातील एकमत यावर काम केले पाहिजे. पुढील काही महिने विरोधी पक्षाने महाराष्ट्र सरकारच्या हातात हात घालून कोव्हिडविरोधातील लढाई लढणे गरजेचे आहे. राजकारण करण्यासाठी उभा जन्म आपल्याकडे आहे. सरकारं येतात सरकारं जातात. पण शेवटी जनता जी सरकार निवडून देते तिच जर जगली नाही तर राज्य आणि सरकार काय कामाचे असेही ते म्हणाले.

लॉकडाऊनमुळे संभ्रवास्थेत सापडलेल्या व्यावसायिक आणि दुकानदारांच्या विरोधावर राऊत म्हणाले, राज्यातील दुकानदार, व्यावसायिकांनी नाराज होण्याची काहीच गरज नाही. कारण मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा निर्णय सर्व क्षेत्रातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुनच घेतला आहे. आपण पाहिले, महाराष्ट्राच्या जवळील गुजरात राज्यात हायकोर्टाने सांगितले की, गुजरातमध्ये लॉकडाऊन का नाही करत, हा हायकोर्टचा आदेश आहे. याचा अर्थ असा आहे की, राज्य सरकारांनी लॉकडाऊन केला नाही तर परिस्थिती अधिक गंभीर होईल. त्यामुळे महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबतचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय जनतेच्या हितासाठीच आहे. यावर पंतप्रधानही कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत चिंतेत आहेत. असेही राऊत म्हणाले.

परमबीर सिंह आणि अनिल देशमुख प्रकरणावरही त्यांनी भाष्य केले. ”कायदा सगळ्यांसाठी सारखा पाहिजे. मला असे वाटते अनिल देशमुख आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत, महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. ही लढाई आता न्यायालयीन लढाई आहे. त्यामुळे यावर आता मत व्यक्त करणे योग्य नाही. पण भष्ट्राचारासंदर्भात नियम, कायदे आणि भूमिका या न्यायालयाच्या आणि राज्यकर्त्यांच्या समान असायला हव्यात.” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.


 

First Published on: April 7, 2021 10:39 AM
Exit mobile version