मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी पूरग्रस्त चिपळूणची पाहणी केली. यावेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी महिलेसोबत अरेरावी केल्याने वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, आता यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सदर प्रकरणावर मला काही बोलायचं नाही, असं म्हणत लोकांना मदत करणं हाच माझा प्राथमिक हेतू आहे, असं भास्कर जाधव म्हणाले.
“मला यावर काहीच बोलायचं नाही. लोकांना मदत करणं हाच माझा प्राथमिक हेतू आहे. कालही मला लोकांना मदत करायची होती. ती महिला माझ्या मुलीसारखी होती. तिच्यासोबत किंवा माझ्या नातू किंवा भाचासारख्या असणाऱ्या मुलासोबतही मी बोलायचं नाही आणि ते सुद्धा कोणत्यातरी चॅनेलच्या प्रतिनिधीला विचारुन बोलायचं असेल तर काम करणं कठीण आहे. पण ज्यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरच सोशल मीडियावर लोक तुटून पडले आहेत,” असं भास्कर जाधव म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.
भास्कर जाधव यांनी पुढे बोलताना टीकाकारांना आज आम्ही रस्ता साफ करत असून टीका करणारे कुठे आहेत अशी विचारणा केली. आपण त्यांना फार महत्व देत नाही. जे कोणी हे घडवलं आहे त्याला योग्य वेळेला उत्तर देईन, असा इशारा भास्कर जाधव यांनी दिला.