द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलताना याची माहिती दिली. याबाबतची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मांडतील, असेही त्यांनी सांगितले.

द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा

भाजप आणि शिवसेना यांचे संबंध ताणले गेले असताना शिवसेनेच्या खासदारांनी ठाकरे यांच्यावर मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी दबाव आणला होता. मुर्मू या आदिवासी समाजाच्या महिला आहेत. मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांची तुलना करता मुर्मू यांनाच पाठिंबा देणे उचित ठरेल, असं स्पष्ट मत खासदारांनी व्यक्त केलं आहे.

मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नव्हे

मुर्मू यांना पाठिंबा दिल्याचा निर्णय झाला म्हणजे भाजपला पाठिंबा दिल्याचं होत नाही. विरोधी पक्षातले यशवंत सिन्हा हे दुसरे उमेदवार आहेत. त्यांनाही आमच्या सद्भावना आहेत. कारण देशामध्ये एकी पाहिजे. हे जरी खर असलं तरी अनेकदा अशा निवडणुकासंदर्भात एक लोक भावना काय आहेत. ते पाहून हा निर्णय घ्यावा लागतो, असं राऊत म्हणाले.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत वेगवेगळ्या प्रकारचे देशात मतप्रवाह आहेत. मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला आहेत. यासंबंधीत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. शिवसेनेत आदिवासी क्षेत्रात काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत. खासदारांच्या प्रत्येकाची मतं आम्ही समजून घेतली. त्यानंतर याबाबत काय करायचे आहे, याबद्दल उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला पाहिजे, असं राऊत म्हणाले.

प्रतिभा ताई पाटील यांनाही पाठिंबा दिला होता..

यापूर्वीसुद्धा प्रतिभा ताई पाटील यांना पाठिंबा दिला होता आणि एनडीएच्या उमेदवाराला तेव्हा पाठिंबा दिला नव्हता. कारण प्रतिभा ताई पाटील पहिली महाराष्ट्राची मराठी महिला आहे. आम्ही प्रणव बाबु मुखर्जी यांनाही पाठिंबा दिला आहे. आम्ही एनडीएत असतानाही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेला अशा प्रकारची निर्णय घेण्याची एक परंपरा आहे, असं राऊत म्हणाले.

२०१२ मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधात जाऊन संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान केले होते. या निवडणुकीत संपुआतर्फे प्रणव मुखर्जी तर रालोआचे उमेदवार म्हणून पी ए संगमा उभे होते. या निवडणुकीत देखील प्रणव मुखर्जी विजयी झाले होते. शिवसेनेच्या पाठिंब्याचे आभार मानण्यासाठी प्रणव मुखर्जी यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती.


हेही वाचा : औरंगाबादचं नामांतर झाल्यास १००० कोटींचा बोजा पडणार, एमआयएमचा दावा


 

First Published on: July 12, 2022 10:16 AM
Exit mobile version