…म्हणून मंत्रिमंडळ विस्तार होत नाही; अंबादास दानवेंची खोचक टीका

…म्हणून मंत्रिमंडळ विस्तार होत नाही; अंबादास दानवेंची खोचक टीका

माविआ सरकार कोसळून राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आले. पण या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) रखडला आहे. यावरूनच विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला. अशातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (ambadas danve) यांनी एक वक्तव्य केले आहे. “मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सत्ताधाऱ्यांच्या मनात भीती आहे. मंत्रिमंडळ विस्तार केला तर लोक सोडून जातील का? अशी भीती सुद्धा त्यांच्या मनात आहे. त्यांनी बऱ्याच लोकांना शब्द दिला आहे आणि प्रत्येकाला दिलेला शब्द पूर्ण करणे हे अवघड आहे आणि हीच भीती असल्याने मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. याला इतर कोणतं दुसरं कारण नाही. असं अंबादास दानवे म्हणाले.

सध्या राज्य मंत्रिमंडळात (Cabinet expansion) मुख्यमंत्री यांच्यासह एकूण 20 सदस्य आहेत. या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या प्रतीक्षेत अनेक आमदार आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदार मंत्रिमंडळाची वाट पाहत आहेत असे विधान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये केले होते. “मंत्रिमंडळाच्या विस्ताराला उशीर होत असल्याने आमदारांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. ही अस्वस्थता आता उघडपणे बाहेर पडू लागली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी सर्व आमदार गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत” असंही एकनाथ खडसे (eknath khadse) म्हणाले.

माणुस मराठवाड्यातील असो किंवा कोकणातला असो तो तिखट असतो
अंबादास दानवे यांनी ठाकरे गटाच्या ‘मालवणी’ महोत्सवात उपस्थितीची लावली होती. “हा उप्रक्रम 25 वर्ष जुना आहे. कोकणातल्या संस्कृतीचे जतन करण्याचे काम अशा उत्सवांमधून होत असते. मी मराठवाड्याचा आहे, हा कोकणातला महोत्सव आहे. माणुस मराठवाड्यातील असो किंवा कोकणातला असो तो तिखट असतो. वरुन तिखट जरी असला तरी आतून तो कोमल असतो”, असंही अंबादास दानवे म्हणाले.


हे ही वाचा – ताकद सगळ्यांमध्येच असते, सगळेच मजबूत असतात; बच्चू कडूंचा राणांना सूचक इशारा

First Published on: November 3, 2022 10:02 AM
Exit mobile version