कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी काढला मोर्चा

कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी काढला मोर्चा

विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा मोर्चा

समान काम, समान वेतन, समान पेन्शन सर्वांसाठी! या मागणीसाठी दादर रेल्वे स्टेशन ते परळच्या कामगार मैदानापर्यंत राज्यभरातून आलेल्या शिक्षक, अंगणवाडी ताई, मानसेवी शिक्षक, अंशकालीन संचालक यांचा मोर्चा निघाला. शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आणि समतेच्या मागणीसाठी हा राज्यव्यापी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्त्व आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी केले.

“समान काम, समान वेतन, समान पेन्शन, सन्मान याची हमी संविधानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली आहे. पण या सरकारला हे मंजूर नाही”, अशी टीका आमदार कपिल पाटील यांनी केली. या लबाड सरकारने गेली साडे चार वर्षे शिक्षण क्षेत्रावर अन्यायाचा वरवंटा फिरवला आहे, असेही ते म्हणाले. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, अंगणवाडी ताईंच्या नेत्या सुनंदा पवार, तसेच इतर शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि शिक्षक सहभागी झाले होते.

विनोद तावडे यांचे स्पष्टीकरण

“कपिल पाटील यांच्या मोर्चानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सहाव्या वेतन आयोगाची अधिसूचना २२ एप्रिल २००९ रोजी निघाली आणि शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय १२ जून २००९ ला निघाला. त्यावेळी कॉंग्रेसची पाटीलकी करणाऱ्यांनी मोर्चा सोडा साधे पत्रक पण काढले नाही”, अशी टीका केली. यावेळी वित्त आयोगाचे सातव्या वेतन आयोग संदर्भातील अधिसूचना ३१ जानेवारी रोजी प्रसिध्द झाले आणि शिक्षण विभागाकडून आठ दिवसांत फाईल वित्त विभागाला पाठविण्यात आली, त्यामुळे आता शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय लवकर निघेल, तरीही मोर्चा का? राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना ज्या दिवशी सातव्या वेतन आयोगाचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील, त्याच दिवशी शिक्षकांनाही मिळतील, जे आधी कधी झाले नव्हते, असेही तावडे यांनी निर्दशनास आणून दिले.

शिवाजी महाराजांच्या विचारावर १५ पाने वाढविली आणि महाराज यांचे व्यक्तिमत्व कुशल प्रशासक दाखविले हे पाटलांना नको होते का? घोकमपट्टीवर आधारीत अभ्यासक्रम बदलून रचनावादी अभ्यासक्रम आणला आणि ज्ञानवर्धन वाढविले हे पाटलांना नको होते का? की घोकमपट्टीवर निर्माण होणारे थ्री इडियट्सच्या चतूर रामालिंगम यांना पाहिजेत का? असा सवाल तावडे यांनी केला आहे. नापास झालेल्या मुलांना कौशल्य विकासाला लावणे, दहावीला फेरपरिक्षा घेऊन विद्यार्थ्यांना एक संधी देऊन त्यांचे वर्ष वाचविणे, आंतरराष्ट्रीय शाळांचे मंडळ निर्माण करणे, खेलो इंडिया मध्ये क्रमांक एक वर येणे, असर अहवालानुसार महाराष्ट्राची शैक्षणिक प्रगती देशात सर्वोत्तम असणे इत्यादी गोष्टी झाल्यामुळे जर साडे चार वर्षात शिक्षण क्षेत्राचे वाटोळे लागले असेल तर कपिल पाटील यांनीच आपले डोके तपासून घेतले पाहिजे असे सामान्य शिक्षक म्हणेल आणि अच्छे दिन कोणते हे घोकमपट्टीवर नाही, तर ज्ञानआधारित वरत कळेल हे पाटील यांनी लक्षात घ्यावे असेही विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

First Published on: February 9, 2019 9:14 PM
Exit mobile version