देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आज दुपारी ४.३० वाजता बोलावली होती. त्यापूर्वी या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याचे समोर आले. त्याऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री बैठकीला का उपस्थित राहिले नाही हे स्पष्ट केले.
राजेश टोपे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पोस्ट ऑपरेटीव्ह ज्या काही त्यांच्या ट्रिटमेंट असतात, त्या अनुषंगाने आज त्यांना म्हणजेच एका वेळी दोन ते अडीच तास एका जागेवर बसून राहणे कदाचित त्यांच्या तब्येतीच्या दृष्टीकोनातून निश्चित प्रकारे योग्य नसल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे तब्येतीच्या कारणामुळे उपस्थित न राहणे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पसंत केले. त्या दृष्टीकोनातून त्यांनी मला पूर्णपणे सर्वकाही सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्यक्तीगत पत्र देऊन याबाबतची माहिती मुख्य सचिव यांनी सांगितली की, आमच्या राज्याच्या वतीने आरोग्यमंत्री बोलतील.
टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत सर्व राज्यांना बोलण्याची संधी दिली नाही. फक्त ८ राज्यांना बोलण्याची संधी मिळाली, उर्वरित राज्यांनी लेखी स्वरुपात आपल्या मागण्या आणि राज्यातील कोरोनाचा आढावा केंद्र सरकारकडे पाठवल्या आहेत.
हेही वाचा – Maharashtra Corona: होम टेस्ट करूनही पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत नसल्यामुळे अशी करणार ठाकरे सरकार व्यवस्था