एसटी कर्मचाऱ्यांसाठी जे जे शक्य ते करणार, उद्धव ठाकरेंचं आश्वासन

एसटी कर्मचाऱ्यांसाठी जे जे शक्य ते करणार, उद्धव ठाकरेंचं आश्वासन

साखरेचा गोडवा राजकारणात आणला

मुंबईः एसटी कर्मचाऱ्यांसाठी जे जे करणं शक्य आहे ते केलं आणि यापुढेही करणारच आहे.  त्यात कुठेही मागेपुढे पाहणार नाही, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा अमृतमहोत्सवी पदार्पण सोहळा आणि विद्युत प्रणालीवर आधारित बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

परिवारातील सदस्य म्हणून आम्ही एसटी कर्मचाऱ्यांकडे पाहत आहोत. म्हणूनच एसटी अडचणीत असताना शासनाने मदत केली. सर्वसामान्यांना परवडणारी परिवहन सेवा देण्याचे काम एसटी करत असल्याने एसटीचा तोटा वाढलाय. मागील काही महिने, एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन शासनाकडून दिलं आणि पुढच्या काही वर्षाची हमी शासनाने घेतली आहे. सर्व करता येतं पण पैशांचे सोंग आणता येत नाही. एसटी कर्मचाऱ्यांसाठी जे  जे करणं शक्य आहे ते केलं आणि यापुढेही करणारच आहे, त्यात कुठेही मागेपुढे पाहणार नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलंय.

राज्यातील रस्ते आता चांगले होत आहेत.पर्यावरणपूरक वाहनं सर्वात जास्त असणारी मुंबई हे पहिलं शहर ठरणार आहे. एसटीतसुद्धा हा प्रयोग आपण करत आहोत. एसटी सेवा प्रदूषणविरहित कशी होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, तसा आपला प्रयत्न असणार आहे. एसटी सुधारणांसाठी नवीन संकल्पना आणतो आहोत. काळ बदलतो तसं तंत्रज्ञान बदलतं, गरजा बदलत आहेत. या बदलाप्रमाणे प्रगती करणं आपल्या सर्वांचे उद्दिष्ट आहे. एसटी कर्मचारी- तुम्ही-आम्ही, राज्यातील जनता सर्व एका कुटुंबातील सदस्य आहोत. कुटुंबातील सर्वांना सुखात आणि आनंदात ठेवणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे, असंही त्यांनी सांगितलंय.

एखादी सेवा जी आपण रोज बघतो, तिचा वापर करतो तेव्हा ती किती वर्षाची झाली, याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. आपल्या एसटीची ७५ वर्षे अशीच आहेत. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत.  आपल्या एसटीची सुरुवात ही १९४८ साली झाली. पहिली एसटी कशी होती, तिचं रंगरूप आकार कसं होतं हे आज आपण चित्रफितीच्या माध्यमातून पाहिलं. आपली एसटी काळानुरुप किती बदलली हे यातून दिसलं. एसटीची ही वाटचाल पुण्यात सुरू झाली आणि एसटीचा आजचा अमृतमहोत्सवी कार्यक्रमही पुण्यात होत आहे हा एक योगायोग आहे. एसटीची ही अमृतमहोत्सवी वाटचाल सर्व माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावी, आजची चित्रफीत सर्व वाहिन्यांवरून दाखवण्यात यावी. म्हणजे काळाप्रमाणे एसटी कशी बदलली हे यातून दिसेल, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.


हेही वाचाः पूरग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे, चंद्रकांत पाटलांचा कोल्हापुरात टाहो मोर्चा

First Published on: June 1, 2022 1:23 PM
Exit mobile version