राज्यावर अवकाळी पावसाचं संकट; रब्बी पिकांसह फळबागांच मोठं नुकसान

राज्यावर अवकाळी पावसाचं संकट; रब्बी पिकांसह फळबागांच मोठं नुकसान

ऐन हिवाळ्यात राज्याच्या अनेक भागांना अवकाळी पावसाने झोडपले आहे. या अवकाळी पावसामुळे शेती, फळबागांचे चांगलेच नुकसान झाले आहे. अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रब्बी पिकांबरोबर फळबाग उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत. खरीप हंगाम वाया गेल्यानंतर आता रब्बी पिकही वाया जाणार? अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

वाशिममध्ये दोन दिवसांपासून पावसाची हजेरी

वाशिम जिल्ह्याला गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. यात काल रात्री उशीरा पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे रब्बी पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर चिंतेत अधिक भर पडली आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे आधीच पिकं संकटात सापडली आहेत अशात अचानक अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. अशा परिस्थितीत आता रब्बी पिकही अस्मानी संकट सापडली आहेत. या अवकाळी पावसामुळे आता शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे.

नंदूरबारमध्ये कापूस, केळीसह रब्बी पिकांना फटका

नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर आणि शाहादा परिसरात जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांपुढे आता आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन पिकं काढणीच्या वेळी कोसळणाऱ्या पावसामुळे तयार पिकं भूईसपाट झाली आहेत. यात जिल्ह्यातील केळी, मिरची आणि रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका सहन करावा लागतोय. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा पिकांना आळीचा धोका निर्माण झाला आहे. अनेक पिक गळून पडत आहेत.

बुलढाण्यात कांद्यासह हरभऱ्याचे नुकसान

बुलढाणा जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काल अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. बुलढाणा शहर आणि परिसरात काल जोरदार पाऊस झाला. यामुळे रब्बी पिक धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा, मोताळा तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे खामगाव तालुक्यातील काळेगाव येथील नदीला हिवाळ्यातही पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे अनेक भागातील कांदा, हरभरा पिकांच मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळली आहे.

कोकणालाही पावसाने झोडपले

कोकणात अनेक भागात हिवाळ्यात फळबागा मोहराने बहरुन जातात. यात विशेषत: आंबा, काजू, फणस, आणि इतर हंगामी पिकांचा काढणीचा सीजन सुरु होतो. मात्र कोकणातही अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे कोकणातील अनेक फळ बागायतदार, व्यापारी चिंतेत सापडले आहेत. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील काही काही भागात सातत्याने अवकाळी पाऊस बरसत आहे. यामुळे आंबा बागायतदार अधिक अडचणीत सापडले आहेत.


राज्‍यातील गड-किल्‍ले, मंदिरे आणि स्‍मारक होणार पुनर्जीवित; सरकारकडून इतका निधी मंजूर

First Published on: December 15, 2022 10:11 AM
Exit mobile version