राजकीय पक्षांवर मतदारांच्या नाराजीचे पडसाद

राजकीय पक्षांवर मतदारांच्या नाराजीचे पडसाद

Election

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. राजकीय पक्ष त्यांचे त्यांचे जाहीरनामे घेऊन मतदारांपर्यंत पोहोचत आहेत, मात्र मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. निवडणुकीत मतदारसंघातील प्रश्नांंवर प्रचाराच्या माध्यमातून चर्चा, ऊहापोह व्हायला पाहिजे. शेतकरी, तरुण, सामान्य जनतेच्या समस्या, अडचणी समजून घेण्यासाठी निवडणुकांचा काळ महत्त्वाचा असतो. परंतू निवडणूक लढविणार्‍यांना जनतेच्या प्रश्नांविषयी जाणही नाही अन आस्थाही नाही, त्यामुळे मतदार उघडघडपणे राजकीय पक्षांवर दोषारोप करत आहेत.

ज्येष्ठ नागरीक पांडुरंग डांगे म्हणाले, सध्याच्या प्रचार सभांमधील भाषणे म्हणजे कशाचा पायपोस कशाला नाही. अशी भाषण ऐकून आम्ही यांना मते का द्यायची? पूर्वीच्या नेत्यांचा अभ्यास, वैचारिकता स्पष्ट करणारी भाषणे आणि आता लोकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी होणारी भाषणे, घसरलेली पातळी अशा फरकामुळेच हल्ली प्रचार सभांना उत्स्फूर्तपणे कोणी येत नाही. महाविद्यालयीन विद्यार्थिनी प्राची सावंत म्हणाले, नवमतदारांकडून अपेक्षा करताना त्यांना आपण काय देणार, याची कुठेही वाच्यता नाही. रायगड जिल्ह्यात भरपूर पाऊस पडतो. धरणांची संख्याही बर्‍यापैकी आहे. तरीही जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईला सुरूवात होते. यावर कोणी बोलत नाही. उशाला धरण असून, जिल्ह्यातील अनेक गाव वाड्यांवर राहणार्‍या जनतेचे घसे कोरडेच कसे, यावर विचारविनिमय निवडणुकीच्या निमित्ताने होणे गरजेचे आहे.

नोकरदार संकेत मोरे म्हणाले, जनतेला भेडसावणारे प्रश्न प्रचारात न घेता फक्त एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच धन्यता मानणारे आजचे राजकारणी विकासाच्या नावाखाली पुन्हा-पुन्हा तिच तिच आश्वासने देत शब्दांचा खेळ करीत मतदारांना देत आहेत. आपल्याकडे शेतकरी राजा, ग्राहक राजा, मतदार राजा असे म्हटले जाते, पण प्रत्यक्षात तो प्रजा म्हणूनही जीवन जगत नसल्याचे चित्र दृष्टीस पडते. तर व्यावसायिक श्रीकांत ल्हासे, स्मिरत गोगरी म्हणाले, पूर्वी निवडणुका लढविल्या जात होत्या त्या लोकांच्या जीवावर, पैशांवर नाही. कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करायचे. सध्या कोणत्याही प्रश्नावर चर्चा करायची नाही, पैसे दिले की निवडून येता, हेच धोरण अवलंबिले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

First Published on: April 17, 2019 4:30 AM
Exit mobile version