माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील घणाघाती टीका केली आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचा दर्जा तर एकदम तकलादू होता, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. तसंच, या योजनेची चौकशी सुरु असावी अशी मागणी देखील केली. जयंत पाटील नांदेड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
जलयुक्त शिवार योजनेवर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च झाला मात्र त्याचा निकाल आला नाही. कामाचा दर्जा तर एकदम तकलादू होता असा आरोप जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. जलयुक्त शिवार योजनेबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता जलयुक्त शिवार योजनेच्या कामावर जोरदार टीका केली. जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करावी अशी मागणी सव्वा वर्षापूर्वी करण्यात आली होती. त्याची चौकशी सुरू असावी असंही जयंत पाटील म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेत ७२ टीएमसी पाणी अडवल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. परंतु ७२ टीएमसी पाणी म्हणजे एका धरणाचे पाणी आहे. मात्र त्यांनी सांगितलेली परिस्थिती तशी नाही आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या कामाबाबत लोकं समाधानी नाहीत असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.
तर देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल – जयंत पाटील
राजकारणात उद्या नरेंद्र मोदीसाहेब किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावरही एखादा अधिकारी आरोप करु शकतो त्यामुळे हे राजकीयदृष्टया अत्यंत चुकीचे आहे. राजकारणातल्या लोकांना अशा पध्दतीने भीती दाखवायला लागले तर देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल अशी भीती जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
हेही वाचा – सत्तेत येण्याची गरज नाही, फक्त आरक्षणाचा मार्ग सांगा; जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला