‘Operation Lotus’ ? म्हणजे काय? कशी झाली सुरूवात?, इतिहास काय ?

‘Operation Lotus’ ? म्हणजे काय? कशी झाली सुरूवात?, इतिहास काय ?

पुद्दुचेरीतले सरकार पाडून दाखवले, आता मार्च एप्रिल महिन्यात ऑपरेशन लोटसला महाराष्ट्रात सुरूवात करू, असे काही भाजप पुढाऱ्यांनी जाहीर केले. मध्य प्रदेशातील सरकार पाडले तेव्हाही पुढचा घाव महाराष्ट्रावरच असे जाहीर केले होते. त्यानंतर बिहारचे निकाल एकदा लागुद्यास मग पहा महाराष्ट्रात परिवर्तन घडवून दाखवोत वगैरे बतावण्याकरून झाल्या. आता बात पुद्दुचेरीची सुरू आहे, पण जशी दिल्ली बहुत दूर है, त्याप्रमाणे महाराष्ट्र तो बहुतही दूर है असे चित्र आहे. मध्य प्रदेश, पुद्दुचेरीत कॉंग्रस होती. महाराष्ट्रात शिवसेना आहे. पुद्दुचेरी झाले, आता महाराष्ट्र असे स्वप्न आता काही जणांना पडत असेल तर त्यांनी स्वप्नातच रहावे अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखात भाजपच्या ऑपरेशन लोटसचा समाचार घेण्यात आला आहे. पुद्दुचेरी पाठोपाठच आता महाराष्ट्रात सुरू झालेल्या ऑपरेशन लोटसलाही अनेक वर्षांचा इतिहास आहे.

ऑपरेशन लोटस नाव कसे पडले ?

कर्नाटकात २००८ साली विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर कोणत्याही एका पक्षाला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. भाजपला ११० जागा, कॉंग्रेसला ८०, जेडीएसला २८ आणि अपक्ष ६ उमेदवार निवडून आले होते. सर्वात मोठा पक्ष असल्यामुळेच भाजपला सरकार स्थापनेसाठी पहिल्यांदा बोलावण्यात आले. त्यावेळी भाजप नेता बी एस येडियुरप्पा यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आला. त्याआधी सात महिने आधीच २००७ रोजी ते सात दिवसांसाठी मुख्यमंत्री राहिले होते. पुरेसे आमदार पाठीशी नसल्यानेच त्यांना अवघ्या सात दिवसात राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर येडियुरप्पा यांना कोणताही धोका पत्करता येणार नव्हता. म्हणूनच त्यांनी अपक्ष आमदारांच्या समर्थनाने सरकार स्थापन करण्यासाठीची तयारी केली. पण या तयारीत स्वतःच्या जोरावर कर्नाटकात सरकार आणताना कमळ उमलवण्यासाठीची त्यांची धडपड मोठी होती. या सगळ्या तयारीलाच ऑपरेशन लोटस असे नाव देण्यात आले. विधानसभेत पाठिंबा मिळवण्यासाठी येडियुरप्पा यांनी विरोधकांपैकीच आमदार फोडायला सुरूवात केली. ज्यामध्ये चार जेडीएस आणि तीन कॉंग्रेसचे आमदार होते. या आमदारांना मोठे आमीष दाखवण्यात आले. पण जर हे आमदार पक्ष बदलून भाजपमध्ये आले असते तर यांच्यावर पक्ष बदल कायद्यान्वये आमदारकी जाण्याची वेळ आली असती. त्यामुळेच यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर या आमदारांच्या जागेवर पोटनिवडणुक लागली. या निवडणुकीत हे आमदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले. येडियुरप्पा यांचे नशीब चांगले म्हणूनच सातपैकी पाच ठिकाणी भाजपला विजय मिळवता आला. त्यामुळेच येडियुरप्पा यांच्यामागे आमदारांचे संख्याबळ वाढतानाच ते ११५ इतके झाले. हीच ऑपरेशन लोटसची सुरूवात होती. त्यानंतरच्या वर्षांमध्येही अनेक ठिकाणी भाजपने ऑपरेशन लोटस वारंवार असे राबवले.

फसलेले ऑपरेशन लोटस

राजस्थानात अशोक गेहलोत विरूद्ध सचिन पायलट असे वर्चस्वासाठीचे युद्ध रंगलेले असतानाच भाजपकडूनही याठिकाणी मोठ्या प्रमाणात ताकद लावण्यात आली. पण अशोक गेहेलोत हे वारंवार आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा करत राहिले. त्यामुळेच भाजपच्या अनेक प्रयत्नानंतरही राजस्थानात भाजपच्या ऑपरेशन लोटसला यश मिळाले नाही. पण गेहलोत यांनी ऑपरेशन लोटसवर भारी पडत स्वतःच एक मोठ ऑपरेशन केल्यानेच भाजपने नियोजित केलेला सगळा डाव बिघडला.

महाराष्ट्रतला पहाटेचा शपथविधी

महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात युती फिस्कटल्यानंतर सर्वाधिक आमदारांचे संख्याबळ असलेला पक्ष हा भाजप होता. पण शिवसेनेने साथ सोडल्यानेच भाजपकडून महाराष्ट्रातही सत्ता स्थापनेसाठीचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांना हाताशी धरून करण्यात आला. एका रात्रीतच राष्ट्रपती राजवट हटवण्याची मागणी तत्कालीन अॅक्टिंग मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपतींकडे केली. रातोरात महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट राजभवनाने मागे घेतली. महाविकास आघाडीची स्थापना होत असतानाच अजितदादा पवार यांच्यासोबत महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठीचा पहाटेचा शपथविधीही पार पडला. पण राष्ट्रवादीने अजितदादा पवार यांचे अधिकार काढून घेतले. तसेच विधानसभेतील त्यांच्याकडील जबाबदारीही रद्दबातल केले. त्यामुळेच सर्वात कमी दिवसांचे सरकार असण्याचा रेकॉर्ड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे झाला. राष्ट्रवादीने पुकारलेल्या व्हीपमुळेच भाजप राष्ट्रवादीचे सरकार अवघ्या काही तासातच कोसळले. त्यानंतर महाविकास आघाडीने सत्ता स्थापनेचा दावा करत मुख्यमंत्री पदाची उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली.


 

First Published on: February 24, 2021 7:12 PM
Exit mobile version