Video: तुम्हाला राम मंदिरापेक्षा बाबरी मशिदीची चिंता कशासाठी? देवेंद्र फडणवीसांची टीका

Video: तुम्हाला राम मंदिरापेक्षा बाबरी मशिदीची चिंता कशासाठी? देवेंद्र फडणवीसांची टीका

देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांना टोला

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. मात्र दुसऱ्या बाजुला मशिदीसाठी ट्रस्ट का नाही स्थापन करण्यात आला? असा प्रश्न काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखनऊ येथे उपस्थित केला होता. पवारांच्या या विधानावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. “मुस्लिम समाजाचे धार्मिक स्थळे बांधण्याचे काम वक्फ बोर्ड करत असते, तिथे ट्रस्ट स्थापला जात नाही. हे सत्य पवारांना देखील माहीत आहे. पण पवारांना राम मंदिर होत आहे, याचा आनंद होत नसून बाबरची मशिद होत नाही, याचे दुःख होत असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

“मशिद व्हायला हवी, त्याबाबत आमचे दुमत नाही. मात्र बाबर हा आक्रमणकारी होता. त्याच्या मशिदीसाठी पवार एवढे आग्रही का आहेत? हे अनाकलनीय आहे. मतांच्या राजकारणासाठी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांकडे डोळेझाक केले जात आहे. तसेच अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन केले जात आहे”, असा आरोप फडणवीस यांनी केला. महाराष्ट्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दि. २४ फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. त्याच्या पुर्वसंध्येला आज विरोधकांच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्यात आला असल्याचे जाहीर केले.

 

भीमा कोरेगावचा तपास वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न

भीमा कोरेगाव प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. काही वर्षांपूर्वी झालेल्या भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराची आणि पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेचा एकमेकांशी संबध आहे. जेव्हा हिंसाचाराची घटना घडली तेव्हा शरद पवारांनी या हिंसाचाराचा संबध हिंदूत्ववाद्यांशी जोडला. मात्र आता शहरी नक्षलवाद्याचे काही पुरावे समोर आल्याचे दिसल्यानेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविला असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगत फक्त पवार यांना या प्रकरणाचा तपास वेगळ्या पध्दतीने न्यायचा होता, असा आरोप केला.

आमच्या सहिष्णूतेला दुर्बलता समजू नका

‘एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी काही दिवसांपूर्वी १०० कोटी हिंदूवर १५ कोटी मुस्लिम भारी पडतील’, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा आज फडणवीस यांनी समाचार घेतला. १०० कोटी हिंदू समाज सहिष्णू असल्यामुळेच तुम्ही या देशात बोलू शकता. आमच्या सहिष्णूतेला दुर्बलता समजण्याचे पाप कुणी करणार असेल तर त्यांची औकात दाखविण्याचे काम आम्हाला करावे लागेल, असे फडणवीस म्हणाले. एखाद्या मुस्लिम राष्ट्रात दुसऱ्या अल्पसंख्यांकाने असे वक्तव्य केले असते, तर त्याची काय अवस्था झाली असती? त्यामुळे कुणीही विनाकारण हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करु नये, अन्यथा आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही फडणवीस यांनी यावेळी दिला.

First Published on: February 23, 2020 6:42 PM
Exit mobile version