गोवंडीमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेमुळे गोंधळ

गोवंडीमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेमुळे गोंधळ

गोवंडीतील मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा

गोवंडीतल्या महापालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरणावरुन पालकांमध्ये गोंधळ झाला. विषबाधा झाल्याच्या संशयावरुन विद्यार्थ्यांना पालकांनी राजावाडी रुग्णालयात घेऊन गेले. शिवाजीनगरमधील पालिकेच्या संजयनगर उर्दु शाळेत ही घटना घडली आहे. चांदणी शेख विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर पालकांमध्ये हा सर्व गोंधळ उडाला. या गैरसमजातून जवळपास १६१ विद्यार्थ्यांना राजावाडी रुग्णालयात आणण्यात आले होते. शाळेमध्ये दिल्या जाणाऱ्या फॉलिक अॅसिडमुळे ही विषबाधा झाल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना नेमका त्रास कशाने झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

राजावाडी हॉस्पिटलला तपासणीसाठी आणलेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य समितीच्या अध्यक्षा अर्चना भालेराव यांनी दिली आहे. मुलांना डिस्चार्ज देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. राजावाडी रुग्णालयात १६१ आणि गोवंडी शताब्दी रुग्णालयामध्ये ३६ विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले आहे.

राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलांना चक्कर आणि पोटदुखीचा त्रास होत होता. विषबाधा झाल्याचा गोंधळ उडाल्यामुळे रुग्णालयात आणखी विद्यार्थ्यांना दाखल केले जात आहे. या विद्यार्थ्यांना नक्की कशातून विषबाधा झाली याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

First Published on: August 10, 2018 1:05 PM
Exit mobile version