BMC : महानगर गॅस उभारणार बायोगॅस प्रकल्प; पालिका करणार सहकार्य

BMC : महानगर गॅस उभारणार बायोगॅस प्रकल्प; पालिका करणार सहकार्य

 

मुंबई: मुंबईतील कचऱ्याची समस्या मार्गी लागावी, महानगरातील प्रदूषण कमी व्हावे यासाठी मुंबई महापालिका आणि महानगर गॅस लिमिटेड यांच्यात कॉम्प्रेस्ड बायोगॅस संयंत्र स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. कचऱ्यापासून तयार होणारा हा बायोगॅस मुंबईला प्रदूषणापासून मुक्त ठेवणार, असा दावा शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. या प्रकल्पामुळे लवकरच मुंबईतील हजारो टन कचऱ्याची समस्या मार्गी लागणार असून मुंबईकरांना पर्यावरणपूरक बायोगॅसही वापरासाठी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.

मुंबई महापालिका आणि महानगर गॅस कंपनी यांच्यामध्ये बायोगॅस संयंत्र प्रकल्प स्थापन करण्याबाबत बुधवारी आज सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पामधून रोजगार निर्मिती होणार आहे. कचऱ्याची विल्हेवाट लागणार असून तीन वर्षात प्रकपा उभारण्यात येणार आहे. याप्रसंगी, मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल, महानगर गॅसचे अध्यक्ष महेश अय्यर, व्यवस्थापक आशू सिंघल, मुंबई महापालिकेच्या उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन)चंदा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

पर्यावरण संतुलनासाठी बायोगॅस योग्य पर्याय

पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी बायोगॅस हा योग्य पर्याय आहे. स्वच्छ आणि सुंदर मुंबईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना मुंबईकरांनीही जोड द्यायला हवी. त्यासाठी प्रत्येकाने ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करायला हवे. गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घ्यावा. तसेच या मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांनाही सामावून घ्या. जेणेकरून शाळेतच मुलांमध्ये जनजागृती केली तर हा विषय घरोघरी पोहोचेल, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

बायोगॅस प्रकल्पामुळे कचऱ्याची समस्या मार्गी लागणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने देशात सर्वत्र पर्यावरण संवर्धन उपक्रमांवर भर दिला जात आहे. आधुनिक, हरित आणि पर्यावरण पूरक इंधनाचे पर्याय स्वीकारून पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी केले जात आहे. महाराष्ट्र शासन देखील राज्यात सौर ऊर्जा, हरित ऊर्जा यावर जोर देत आहे. या शृंखलेतील हा बायोगॅसचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर आपण भविष्यातील आधुनिक मुंबई पाहणार आहोत. कचऱ्याची समस्या मार्गी लागणार आहे, असा दावा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी केला.

कार्बन न्यूट्रलसाठीचे उद्दिष्ट

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून कचऱ्याचे विलगीकरण आणि पुनर्वापराची प्रक्रिया नियमितपणे करण्यात येते. मुंबईत सन २०५० पर्यंत कार्बन न्यूट्रलसाठीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट इतर शहरांच्या तुलनेत वीस वर्ष आधीचे ठेवण्यात आले आहे, असे प्रतिपादन मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी केले आहे. महानगर गॅसचे अध्यक्ष महेश अय्यर यांनी या प्रकल्पाबाबत माहिती दिली. येत्या दोन वर्षात हा प्रकल्प सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आशु सिघल यांनी या प्रकल्पाचे फायदे सांगितले.

असा आहे प्रकल्प

मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बँक्वेट हॉल येथील वाया गेलेले अन्न आणि मोठ्या भाजी मंडईतील वाया गेलेला भाजीपाला संकलित करण्यात येणार आहे. त्यानंतर या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी दररोज लागणारा कचरा मुंबई महापालिकेकडून खास वाहनातून पुरविला जाणार आहे. कचऱ्याचे संकलन, पृथक्करण आणि वितरण अशी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

तीन टप्प्यांत सुरू होणार प्रकल्पाचे काम

बायोगॅस प्रकल्प प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तीन टप्प्यांत या प्रकल्पाचे काम सुरू राहणार आहे. त्यात जैविक कचरा प्रक्रिया प्रकल्प, सेंद्रिय खत उत्पादन संयंत्र आणि हरित इंधन उत्पादन संयंत्र या टप्प्यांचा समावेश असेल. या प्रकल्पाद्वारे उत्पादित केलेला जैविक वायू बृहन्मुंबईच्या हद्दीत वापरला जाणार आहे. या प्रकल्पासाठी जैविक कचरा देण्याचे नियोजन सुरू केल्याची माहिती उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांनी दिली.

 

First Published on: June 8, 2023 11:31 PM
Exit mobile version