Corona: मुंबईकरांना पालिकेचा आधार; ४७१ लोकांचा हेल्पलाईनवर संपर्क

Corona: मुंबईकरांना पालिकेचा आधार; ४७१ लोकांचा हेल्पलाईनवर संपर्क

पालिकेची हेल्पलाईन सेवा

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गरीब आणि गरजु तसेच निराधार कुटुंबांची होणारी परवड लक्षात घेता महापालिकेने मदतीसाठी सुरु केलेल्या हेल्पलाईनवर एकाच दिवशी ४७१ लोकांनी संपर्क साधत मदतीची मागणी केली. मागील चार दिवसांमध्ये एकूण ८८० लोकांनी संपर्क केला असून लोकांच्या मागणीनुसार महापालिकेने एकूण ३७४६ लोकांपर्यंत मदत पोहोचवली असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

या विभागात पुरवल्या सुविधा 

गरीब, गरजू लोकांनी उपाशी राहू नये, त्यांच्यापर्यंत मदत पेाहोचली जावी. तसेच त्यांना अन्नधान्य तसेच जेवण पुरवता यावे यासाठी मुंबई महापालिकेने १८०० २२१ २९२ ही हेल्पलाईन ३० मार्चपासून सुरु केली आहे. त्यामुळे १ एप्रिल २०२० पर्यंत घेण्यात आलेल्या आढाव्यामध्ये शहर आणि दोन्ही उपनगरांतून एकूण ४०९ लोकांनी संपर्क साधून मदतीची मागणी केली होती. तर २ मार्च रोजी एकाच दिवशी ४७१ लोकांनी मदतीची मागणी केली. आतापर्यंत लोकांनी केलेल्या मागणीनुसार ६४३ लोकांच्या मागणीनुसार किराणा माल सामान तसेच ७९ लोकांच्या मागणीनुसार शिजवलेले अन्न वाटप करण्यात आहे. बुधवारी जी-उत्तर विभागातून सर्वाधिक लोकांनी मदतीसाठी हेल्पलाईनवर संपर्क केला होता. परंतु गुरुवारीही याच भागातून सर्वाधिक म्हणजे १५४ लोकांनी संपर्क केला आहे. त्या खालोखाल वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व अर्थात एच-पूर्व विभागातून ८४ लोकांनी तर अंधेरी-जोगेश्वरी (पूर्व) या के-पूर्व भागातून ६४ लोकांनी संपर्क केला आहे.

यामध्ये शहर भागातून २७८, पूर्व उपनगरांतून २०५ आणि पश्चिम उपनगरांतून २७८ लोकांनी आतापर्यंत या हेल्पलाईनद्वारे मदत मागितली आहे. यामध्ये आतापर्यंत ६४३ लोकांनी जिवनावश्यक असलेल्या अन्नधान्याची मागणी केली आहे. तर केवळ ७९ लोकांनी जेवण उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच ५ लोकांनी राहण्याची तर ७ लोकांनी वाहतुकीची व्यवस्था करण्याची मागणी याद्वारे केली असल्याचे दिसून येते.

First Published on: April 2, 2020 9:38 PM
Exit mobile version