दर्शन तणावात होता, जातीभेदाची शक्यता नाही; आयआयटीच्या चौकशी समितीचा अहवाल

दर्शन तणावात होता, जातीभेदाची शक्यता नाही; आयआयटीच्या चौकशी समितीचा अहवाल

 

मुंबईः मुंबई आयआयटीमधील विद्यार्थी दर्शन सोळकींने जातीभेदामुळे आत्महत्या केल्याची शक्यता नाकारणारा चौकशी अहवाल आयआयटीच्याच चौकशी समितीने दिल्याची बाब समोर आली आहे. अभ्यासात कमी पडत असल्याने दर्शन तणावात होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता चौकशी समितीने अहवालात नमूद केली आहे. एका वृत संकेतस्थळाने या चौकशी अहवालाचे वृत्त प्रसारीत केले आहे.

१२ फेब्रवारी २०२३ रोजी दर्शनने मुंबई आयआयटी संकुलात आत्महत्या केली. दर्शन हा गुजरातचा रहिवासी आहे. त्याने जातीभेदाला कंटाळून आत्म्हत्या केल्याचा आरोप झाला होता. दलित संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदवला होता. त्यानंतर दर्शनच्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी मुंबई आयआयटीने एक चौकशी समिती नेमली. या समितीने दर्शनसोबत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले. दर्शनच्या कुटुंबियांचेही जबाब समितीने नोंदवून घेतले. सेमिस्टरमध्ये दर्शन अभ्यासात कमी पडला होता. त्यामुळे तो तणावात होता. मुंबई आयआयटीमधील बी. टेकचा प्रवेश रद्द करून गावीच कुठे तरी प्रवेश घेईन असे तो मित्रांना सांगायचा. ही बाब विद्यार्थ्यांच्या जबाबातून समोर आली आहे. दर्शनच्या बहिणीने  आयआयटीमधील जातीभेदचा उल्लेख जबाबात केला आहे. मात्र तिच्या व्यतिरिक्त कोणीही तसा उल्लेख केलेला नाही, असे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान दर्शनच्या आत्महत्येनंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबई आयआयटी संकुलाला भेट दिली होती. केंद्रीय मंत्री आठवले यांनी दर्शनच्या आत्महत्येची सखोल चौकशीची मागणी केली होती. दर्शन सोळंकी यांचे त्यांच्या वडिलांशी बोलणे झाले होते. त्याला एका विषयाचा पेपर कठीण गेला होता. त्यामुळे त्याच्या वडिलांनी दर्शनला खंबीर राहण्याचा सल्ला दिला. तसेच, पुन्हा गावी अहमदाबादमध्ये जाऊ, मी येत आहे, असा निरोप दिला होता. मात्र तरीही लगेच दर्शन सोळंकीने आत्महत्या केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून यात जातीवाद आहे का? की अन्य कारण आहे? याचा शोध पोलीस यंत्रणेने घेतला पाहिजे. त्यासाठी आपण उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी समिती नेमून दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले होते.

First Published on: March 7, 2023 10:08 PM
Exit mobile version