नवी मुंबईतील प्रॉपर्टी ला विकासाची जोड

नवी मुंबईतील प्रॉपर्टी ला विकासाची जोड

Properties

नवी मुंबई पट्ट्यातील द्रोणागिरीचा विकास करण्याचा सिडकोचा मानस आहे. दीर्घ काळासाठी जर गुंतवणूक करायची असेल तर नवी मुंबई भागात गुंतवणूक करणे हा एक फार चांगला पर्याय आहे. नवी मुंबईतील विकासक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक युक्त्या वापरताना दिसतात. हे फक्त नवी मुंबईतील काही भागांपुरतेच मर्यादित नसून छोट्या भागातदेखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक पर्याय विकासक देताना दिसतात. यातील अनेक ठिकाणे ही नव्याने विकसित झालेली आहेत किंवा होत आहेत. त्यांच्या पायाभूत सुविधांचे काम सिडकोमार्फत होत असून घर बांधणीचे काम खासगी बिल्डर्स आणि विकासक करत आहेत. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम जलदगतीने होत असल्याने या ठिकाणी घरांना महत्त्व वाढत आहे.

ग्राहकांना प्रॉपर्टी विकताना, प्रॉपर्टीबरोबर आकर्षक भेटवस्तू देण्याचा अर्थ रिअल इस्टेट मार्केट मंदावले आहे असे नाही तर, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक विकासक नवनवीन युक्त्या लढवत आहेत, असे इथल्या विकासकांचे मत आहे. अशा ऑफर्समुळे अनेक ग्राहक आकर्षित होतात, पण जे खरोखरच गुंतवणूक करू इच्छितात तेच ग्राहक मागे पडत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. नावाजलेल्या विकासकांच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणे केव्हाही चांगले. कारण अशा प्रकल्पांमध्ये अनेक आकर्षक ऑफर्स मिळतात. शिवाय त्यांच्या पुर्वानुभवामुळे आणि मार्केटमध्ये नाव असल्यामुळे फसवणुकीला वाव कमी असतो. तसेच गुंतवणूक योग्य ठिकाणी झाल्याची ग्राहकाला खात्रीही राहते.

नवी मुंबई पट्ट्यातील उरण आणि द्रोणागिरी इथले प्रकल्प हे नावाजलेल्या विकासकांचे आहेत. रिअल इस्टेट डेव्हलपमेंटच्या दृष्टीने द्रोणागिरीचा विकास करण्याचा सिडकोचा मानस आहे. पण उरणमध्ये पायाभूत सुविधांचा प्रस्ताव फार पूर्वी देण्यात आला होता. त्यात आतापर्यंत कोणतीच सुधारणा दिसून आली नाही. खरे तर, तिथे नव्याने उभ्या राहात असलेल्या बिल्डिंग आणि टॉवर्सला तिथल्या स्थानिक रहिवाशांचाच विरोध आहे. त्यांच्या मते, नव्याने तयार होणार्‍या बांधकामांमुळे प्रदूषण वाढते आणि बांधकाम करणारे विकासक रस्ते तसेच स्थानिक सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करतात. सिडकोने सीवूड्स ते खारकोपर रेल्वे स्टेशनचे बांधकाम केले आहे. गव्हाण आणि रांजनपाडा इथे भूसंपादन समस्या असल्यामुळे उरण, द्रोणागिरी आणि न्हावाशेवापर्यंत अजूनही रेल्वे पोहोचलेली नाही.

तुम्हाला दीर्घ काळासाठी जर गुंतवणूक करायची असेल तर नवी मुंबई भागात गुंतवणूक करणे हा एक फार चांगला पर्याय आहे. शिवाय कामानिमित्त नवी मुंबईमध्ये येणार्‍यांनी जर तिथे गुंतवणूक करण्याचा विचार केला तर भविष्यात तिथे राहणे सुलभ होईल. जेएनपीटीत उपलब्ध होणार्‍या नोकर्‍या तसेच हार्बर लिंक रोड, नवी मुंबई मेट्रो, रेल्वे, आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या पायाभूत सुविधा या गोष्टींचा सकारात्मक परिणाम इथल्या रिअल इस्टेट मार्केटवर होऊ शकतो.

विमानतळामुळे घरांच्या किंमती वाढल्या

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचे काम अतिशय जलदगतीने सुरू आहे. सरकारने त्यासाठी भूसंपादन पूर्ण केले असून प्रत्यक्ष विमानतळ उभारणीच्या कामाला सुरूवातही झाली आहे. पुढच्या २ वर्षांत विमानतळाचे काम बहुतांश पूर्ण झालेले असणार. त्यावेळी या भागातील घरांच्या किंमती गगणाला भिडलेल्या असतील. त्यामुळे आतापासूनच पनवेल भागातील गावांमध्ये मोठमोठे अपार्टमेंट उभारण्यात येत आहेत. त्या ठिकाणी लोक भविष्यातील गुंतवणूक म्हणून पहात असून त्यादृष्टीकोनातून या ठिकाणी मुंबई-पुणे भागातील नागरीक या ठिकाणी सेकंड इन्व्हेसमेंट म्हणून गुंतवणूक करत आहेत. त्यासाठी आतापासून घरांच्या किंमती वाढत आहेत. विमानतळाचे काम जसजसे पूर्ण होत जाईल, तस तसे या भागातील घरांच्या किंमती वाढत जाणार आहेत. विमानतळ वापरायला सुरू होईल, तेव्हा मात्र या किंमती अधिक वाढलेल्या असतील.

दक्षिण नवी मुंबईमध्ये 1 बीएचके साधारणतः २० ते 2२ लाखांपर्यंत आहेत तर 2 बीएचकेची घर ३० ते ३५ लाख रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत. जर तुम्ही 3 बीएचके घर बघत असाल तर तुम्हाला साधारणतः ५० लाख रूपयांपर्यंतची तरतूद करावी लागेल.

खारघर, नेरूळ आणि घणसोली या नवी मुंबईच्या इतर भागात 1 बीएचके घरांच्या किंमती ३० लाखांच्या आसपास आहेत तर 2 बीएचकेची घरे साधारणतः ४५ लाखांच्या आसपास आहेत. 3 बीएचकेच्या घरांच्या किंमती 80 लाखांपर्यंत आहेत.

उरण आणि द्रोणागिरी इथले प्रकल्प हे नामांकित विकासकांचे आहेत. रिअल इस्टेट डेव्हलपमेण्टच्या दृष्टीने द्रोणागिरीचा विकास जलद गतीने होण्यास पोषक वातावरण आहे.

First Published on: November 10, 2018 12:28 AM
Exit mobile version