मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी करण्यात येणार आहे. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस.कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी करण्यात येणार आहे. मागील सुनावणीच्या वेळी हायकोर्टाने परमबीर सिंह यांना फटकारले होते. परमबीर यांच्यावतीने विक्रम ननकानी तर राज्य सरकारच्यावतीने अॅडव्होकेट जनरल अशुतोष कुंभकोणी बाजू मांडत आहेत. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यविरोधात केलेली याचिका फेटाळावी असा युक्तिवाद कुंभकोणी यांनी केला होता परंतु यावर तथ्य मांडण्यास सांगितले असल्यामुळे याचिकेवर आज निर्णय होण्याची शक्यता आहे.
परमबीर सिंह यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी ३१ मार्चरोजी सुनावणी करण्यात आली. या सुनावणीदरम्यान राज्य सरकारकडून बाजू मांडताना महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी परमबीर सिंह यांचा वैयक्तित स्वार्थ असल्याचे सांगत परमबीर सिंह यांच्या याचिकेवर जोरदार विरोध करण्यात आला होता.
हायकोर्टाचा परमबीर सिंहांना दणका
मागील सुनावणीत परमबीर सिंह यांना हायकोर्टाने काही सवाल केले होते. या प्रकरणात तुम्ही कोणता गुन्हा, एफआयआर दाखल केला आहे का? कोणत्या आधारावर चौकशीचे आदेश द्यायचे तसेच तुमच्याकडे या आरोपांबाबत काही पुरावे आहेत का? असा सवाल हाय कोर्टाने परमबीर सिंह यांना केला होता.
तुमचे वरिष्ठ जर कायदा मोडत असतील तर मुंबई पोलिस आयुक्त या नात्यानं गुन्हा दाखल करणे, ही तुमचीच जबाबदारी आहे असेही हायकोर्टाने यावेळी सांगितले. तुमच्या कर्तव्यामध्ये तुम्ही कमी पडला. तुमचे वरिष्ठ कायदा मोडत असतील तर गुन्हा नोंदवण ही तुमचीच जबाबदारी असल्याचेही उच्च न्यायालयाने सुनावले.